
Indian Embassy Iran Advisory : भारतीय दूतावासाची सुरक्षा सूचना: इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक नवीन सुरक्षा सूचना जारी केली आहे. त्यात इराणमध्ये (US Iran War) राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने आपत्कालीन आणि समन्वयासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.
दूतावासाच्या सूचनेनुसार, “७ एप्रिल २०२६ रोजीच्या सूचनेच्या आणि अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय नागरिकांना दूतावासाच्या मार्गदर्शनानुसार आणि सुचवलेल्या मार्गांनुसार शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, दूतावासाशी पूर्व सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही या सुचनेत सांगण्यात आले आहे.
दरम्यान एक दिवस आधीच, भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी एक सूचना जारी केली होती. त्यात म्हटले होते की, “इराणमधील भारतीय नागरिकांनी पुढील ४८ तास आपापल्या निवासस्थानीच राहावे.” या काळात, त्यांनी विद्युत उपकरणे, लष्करी तळ आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहावे. घरातच राहावे आणि दूतावासाने जारी केलेल्या सूचना व समन्वयानंतरच महामार्गांवर प्रवास करावा.”
सीमावर्ती भागात स्वतंत्रपणे प्रवास टाळण्याबाबत सूचना
भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सूचना जारी केली आहे, ज्यात असे म्हटले आहे की कोणत्याही परिस्थितीत पूर्वपरवानगीशिवाय सीमेपलीकडे स्वतंत्रपणे प्रवास करू नये.
इराणमधील भारतीय दूतावासाने आपत्कालीन मोबाईल क्रमांक देखील जारी केले आहेत:
989128109115
+989128109102
+989128109109
+989932179359
मदतीसाठी, cons.tehran@mea.gov.in या ईमेलद्वारे संपर्क साधा.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही कायम असून, तेथे अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, संघर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये अंदाजे ९,००० भारतीय नागरिक उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.
आतापर्यंत यापैकी १,८०० भारतीयांना यशस्वीपणे सुखरूप भारतात परत आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित ७,२०० नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असून भारत सरकार या बाबतीत कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही. जरी अमेरिका आणि इराण दरम्यान नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला असला, तरी परिस्थिती पूर्णपणे सामान्य नसल्याने भारतीय दूतावास सातत्याने तेथील नागरिकांच्या संपर्कात आहे.
२८ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर संपूर्ण आखाती प्रदेशात अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच अवलंबून राहावे, अशा स्पष्ट सूचना परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.