Nepal Crises:
Nepal Protest: गेल्या तीन-चार दिवसांपासून भारताच्या शेजारील देश नेपाळ हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया अॅप्स बंद केल्यानंतर देशात हिंसाचाराची ठिगणी पडली. सोशल मीडियावरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ‘जेन जी’ निदर्शन सुरू झाले. आंदोलकांनी अनेक मंत्र्यांचा पाठलाग केला, मंत्र्यांना, आमदार, खासदारांना मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली. नेपाळच्या तीन प्रमुख तुरुंगांमधून कैदीही पळून गेले. निदर्शकांनी माजी गृहमंत्री रवी लामिछाने यांची काठमांडूच्या नाखू तुरुंगातून सुटका केली. नेपाळी लष्कराकडूनही देशातील नागरिकांना हिंसाचार थांबवून शांतता आणि संवादाचे आवाहन करण्यात आले.
या सगळ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या एका भारतीय महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. महिलेने एक व्हिडीओच्या माध्यमातून नेपाळमधील परिस्थिती सांगितली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलेने सांगितले की, ” माझे नाव उपासना गिल आहे आणि मी हा व्हिडिओ प्रफुल्ल गर्गला पाठवत आहे. मी भारतीय दूतावासाला विनंती करते की कृपया आम्हाला मदत करा. जो कोणी आम्हाला मदत करू शकेल त्याने कृपया मदत करा. नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला पोहचला आहे. मी राहत असलेल्या हॉटलेला आंदोलकांनी आग लावली. त्यावेळी मी स्पा मध्ये होते. आंदोलकांचा जमाव माझ्या मागे काठ्या घेऊन लागला होता. ज्यामुळे मी जीव मुठीत धरून पळू लागले.
महिलेने सांगितले की, ‘ मी येथे नेपाळमधील पोखरामध्ये अडकले आहे. मी येथे व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी आले होते. मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते. ते जळून खाक झाले. माझे सर्व सामान माझ्या खोलीत होते. आंदोलकांच्या जमावाने संपूर्ण हॉटेलला आग लागली. मी एका स्पामध्ये होते. लोक मोठ्या काठ्या घेऊन माझ्या मागे धावत होते. पण मी तिथून पळ काढत कसाबसा माझा जीव वाचवला.”
उपासना गिलच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी पर्यटकांनाही सोडले नाही. इथली परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली आहे. सर्वत्र रस्ते पेटवले जात आहेत. कोणी पर्यटक असो वा कोणी कामानिमित्त तिथे गेलेला असो, आंदोलकांना कशाचीही पर्वा नाही. ते विचार न करता सर्वत्र आग लावत आहेत आणि येथील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. आम्हाला माहित नाही की आम्ही किती काळ दुसऱ्या हॉटेलमध्ये राहणार आहोत, परंतु मी फक्त विनंती करते की कृपया हा व्हिडिओ, हा संदेश भारतीय दूतावासाला पाठवा. मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की कृपया आम्हाला मदत करा. माझ्यासोबत येथे बरेच लोक आहेत आणि आम्ही सर्व येथे अडकलो आहोत.
परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी सल्लागार जारी केला आहे. त्यानुसार, नेपाळमधील भारतीय नागरिकांनी स्थानिक सुरक्षा यंत्रणांकडून तसेच काठमांडूमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही मदतीसाठी काठमांडूमधील भारतीय दूतावासाच्या खालील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल :
📞 977 – 980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
📞 977 – 981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)