
बलूचिस्तान ११ ऑगस्ट
राष्ट्रवादी संघटनांचे म्हणणे आहे की, ११ ऑगस्ट १९४७ रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र अस्तित्व मिळाले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याचे विलीनीकरण झाल्याचा इतिहास ते मांडतात आणि त्याच आधारावर स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुन्हा पुढे आणली जात आहे. या संघटनांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडेही या प्रश्नाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने या मागणीला कोणतीही मान्यता दिलेली नाही आणि बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच अविभाज्य भाग असल्याची भूमिका कायम ठेवली आहे.
बलुचिस्तानमध्ये गेल्या काही काळात सुरक्षा दलांवर हल्ले, स्फोट आणि सशस्त्र संघर्षाच्या घटना वाढल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानकडून या भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कारवाया सुरू आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी गटांचा दावा आहे की स्थानिक नागरिकांवर अन्याय होत असून, त्यांच्या राजकीय आणि आर्थिक हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे स्थानिक असंतोष अधिक तीव्र होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
११ ऑगस्टच्या घोषणेमागे केवळ प्रतीकात्मक संदेश नसून, बलुचिस्तानचा प्रश्न पुन्हा जागतिक स्तरावर चर्चेत आणण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषक सांगतात. काही संघटना विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे समर्थनाची मागणी करत आहेत. मात्र, स्वतंत्र बलुचिस्तानला अद्याप कोणत्याही देशाने अधिकृत मान्यता दिलेली नाही.
World News : PoK निवडणुकीनंतर नवाझ पुन्हा सत्तेत? पाकिस्तानात राजकीय खळबळ
विश्लेषकांच्या मते, बलुचिस्तानमधील परिस्थिती पाकिस्तानसाठी केवळ सुरक्षा नव्हे तर राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही मोठे आव्हान ठरत आहे. विशेषतः या प्रदेशातील नैसर्गिक संसाधने, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) आणि प्रादेशिक भू-राजकारणामुळे या घडामोडींवर जगाचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत ११ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.