
फोटो सौजन्य: Gemini
सध्याच्या बदलत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. मात्र, अनेक EV मालकांना एक सामान्य समस्या भेडसावत आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक गाडी रात्रभर बंद ठेवूनही बॅटरी हळूहळू कमी होते. अनेकांना वाटते की गाडी बंद असल्यास बॅटरीवर काहीच परिणाम होत नाही, पण प्रत्यक्षात तसे नसते. या मागे काही महत्त्वाची कारणे असतात, जी वेळेत समजून घेणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते. या बॅटरीमध्ये थोडा-फार डिस्चार्ज होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजेच, गाडी काही दिवस वापरली नाही तर बॅटरीचा टक्का थोडा कमी होणे सामान्य आहे. तसेच, गाडी बंद असली तरी काही सिस्टम्स पार्श्वभूमीत कार्यरत असतात. जसे की बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, सिक्युरिटी अलार्म, रिमोट कनेक्टिव्हिटी आणि सॉफ्टवेअर अपडेट्स, हे सर्व हळूहळू बॅटरीचा वापर करत राहतात.
अत्यंत थंडी किंवा उष्णता याचा बॅटरीवर थेट परिणाम होतो. जसे की थंड हवामानात बॅटरीतील रासायनिक प्रक्रिया मंदावते, त्यामुळे क्षमता कमी वाटते. तसेच, जास्त उष्णतेमुळे बॅटरीचे घटक प्रभावित होतात आणि परफॉर्मन्स कमी होतो. काही वेळा बॅटरी योग्य तापमानात ठेवण्यासाठी सिस्टम स्वतःच हीटिंग किंवा कूलिंग करते, ज्यामुळेही बॅटरी थोडी खर्च होते.
सामान्य परिस्थितीत गाडी रात्रभर उभी ठेवली तरी बॅटरी पूर्णपणे संपत नाही. पण जर असे होत असेल तर त्यामागे काही समस्या असू शकतात. उदा. बॅटरीमध्ये बिघाड,चार्जिंग सिस्टममध्ये समस्या किंवा एखादे फीचर सतत सुरू राहणे.
जर गाडीची रेंज कमी होत असेल, चार्जिंग वेळ वाढत असेल किंवा परफॉर्मन्स कमी होत असेल, तर ती बॅटरी क्षमतेत घट झाल्याची चिन्हे आहेत. साधारणपणे बॅटरीची क्षमता 70% पर्यंत कमी झाली की ती बदलण्याचा विचार करावा.