'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आता या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी अर्थात 5 ऑक्टोबर रोजी देशातील पीएम किसान योजनेच्या पात्र कोट्यवधी शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट देत किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता जारी केला आहे.
9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी हस्तांतरित
आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पीएम मोदींनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये वाशिम येथून हस्तांतरित केले आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली आहे.
काय आहे पीएम किसान योजना?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रामुख्याने शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपये आहे. साधारणपणे पीएम किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो.
हे देखील वाचा – 32,000 कोटी घेऊन चीनमध्ये पळाले; विदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय!
राज्यात आतापर्यंत शेतकऱ्यांना 32,000 कोटी मिळाले
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर आता 18 व्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील दिला आहे.
2.5 कोटी शेतकऱ्यांचा वेबकास्टद्वारे सहभाग
यावेळी वाशिम येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.