
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स ७४,५६३ अंकांच्या तुलनेत खाली घसरून ७४,४१५ वर उघडला होता. सुरुवातीच्या व्यवहारात तो ७३,९४९ पर्यंत खाली गेला होता. मात्र, दुपारी २:२० च्या सुमारास बाजारात अचानक खरेदीचा जोर वाढला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९३८ अंकांच्या (१.२६%) मोठ्या उसळीसह ७५,५०२.८५ वर स्थिरावला.
अशीच स्थिती राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) निफ्टीमध्येही पाहायला मिळाली. निफ्टी २३,११६ वर उघडला आणि घसरत २२,९५५ पर्यंत खाली आला होता. पण सेन्सेक्सच्या बरोबरीने निफ्टीनेही वेग पकडला आणि अखेर २५७ अंकांच्या वाढीसह २३,४०८.८० वर बंद झाला.
बाजारातील या अचानक आलेल्या तेजीमध्ये काही बड्या कंपन्यांच्या शेअर्सनी मोलाची कामगिरी बजावली:
लार्जकॅप श्रेणी: ट्रेंट (३.०१%), एचडीएफसी बँक (२.८८%), एम अँड एम (२.८६%), बजाज फायनान्स (२.७९%), आयटीसी (२.२२%) आणि टाटा स्टील (२.०४%) हे शेअर्स वधारले.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप: पेटीएम (३.८६%), पूनावाला फिनकॉर्प (४.४०%) आणि अपोलो टायर्स (३.३८%) या शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली.
बाजारात दुपारी अचानक आलेल्या या तेजीमागे काही प्रमुख कारणे होती: १. व्हॅल्यू बाइंग: शेअर बाजार खालच्या स्तरावर असताना गुंतवणूकदारांनी स्वस्त दरात शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. २. सेक्टरचा पाठिंबा: मेटल, ऑटो, बँकिंग आणि एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील शेअर्सनी मार्केटला वर नेण्यात मदत केली. ३. भीती कमी झाली: बाजारातील भीतीचा निर्देशांक मानला जाणारा ‘इंडिया विक्स’ (India VIX) ५% टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
महत्त्वाची टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.