
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, रील्स, मेसेजेस आणि ऑनलाइन कंटेंटमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून सहज विचलित होते. अनेक विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात, तासन्तास पुस्तकासमोर बसतात, पण थोड्याच वेळात शिकलेले विसरून जातात. यामागचे मुख्य कारण म्हणजे अभ्यासात आवश्यक असलेली एकाग्रता टिकून न राहणे. जर अभ्यास करताना तुमचे लक्ष वारंवार भटकत असेल, तर काही वैज्ञानिक आणि प्रभावी उपाय अवलंबून तुम्ही तुमची एकाग्रता नक्कीच वाढवू शकता.
सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ‘मल्टीटास्किंग’ टाळणे. अनेक विद्यार्थी अभ्यास करताना मोबाईल पाहणे, गाणी ऐकणे किंवा सोशल मीडिया स्क्रोल करणे अशी अनेक कामे एकाच वेळी करतात. मात्र, संशोधनानुसार एकाचवेळी अनेक कामे केल्याने मेंदूवर ताण येतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अभ्यासाच्या वेळी मोबाईल सायलेंट किंवा दूर ठेवणे आणि संपूर्ण लक्ष फक्त एका विषयावर केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि लक्षात राहतो.
अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी ‘पोमोडोरो तंत्र’ खूप उपयुक्त ठरते. या तंत्रानुसार ३० ते ४० मिनिटे सलग अभ्यास करायचा आणि त्यानंतर ५ मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायचा. असे चार सत्र पूर्ण झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांचा मोठा ब्रेक घ्यावा. हे छोटे ब्रेक मेंदूला ताजेतवाने ठेवतात, थकवा कमी करतात आणि अभ्यासातील उत्साह टिकवून ठेवण्यास मदत करतात. सतत तासन्तास अभ्यास करण्यापेक्षा अशा पद्धतीने अभ्यास केल्यास लक्ष अधिक काळ टिकते.
‘माइंड मॅपिंग’ तंत्र हेही एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. या पद्धतीत विषय फक्त लिहून न शिकता, त्याचे चित्र, आकृती, फ्लोचार्ट किंवा रंगीत नोट्सच्या स्वरूपात सादरीकरण केले जाते. मुख्य मुद्दा मध्यभागी लिहून त्याभोवती उपमुद्दे काढले जातात. यामुळे मेंदूला विषय दृश्य स्वरूपात समजतो आणि तो दीर्घकाळ लक्षात राहतो. परीक्षेपूर्वी पुनरावृत्ती करणेही या तंत्रामुळे सोपे होते.
याशिवाय अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शांत, स्वच्छ आणि प्रकाशयुक्त जागा निवडावी. अभ्यासाच्या जागी अनावश्यक वस्तू, टीव्ही किंवा मोबाईल नसावा. ठराविक वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास मेंदू त्या सवयीला सरावतो आणि एकाग्रता आपोआप वाढते. एकूणच, सोशल मीडियाच्या गर्दीत अभ्यास करणे जरी कठीण झाले असले, तरी योग्य तंत्र, शिस्त आणि सवयी लावल्यास एकाग्रता वाढवणे नक्कीच शक्य आहे. थोडा संयम, नियोजन आणि सातत्य ठेवले, तर अभ्यास अधिक प्रभावी होईल आणि यशाचा मार्ग सुकर बनेल.