फोटो सौजन्य - Social Media
मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेणे हे स्वप्न असते, मात्र वाढते शिक्षण शुल्क आणि राहणीमानाचा खर्च पाहता ते मोठे आर्थिक आव्हान ठरते. अशा परिस्थितीत शैक्षणिक कर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. भारतातील अनेक सरकारी व खासगी बँका परदेशी शिक्षणासाठी तुलनेने कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज देतात. मात्र कर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.
कर्जाची हमी (थर्ड पार्टी गॅरंटी)
बहुतेक बँका चार लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज कोणत्याही हमीदाराशिवाय देतात. मात्र जर कर्जाची रक्कम ७.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँकेकडे मालमत्ता, विमा पॉलिसी किंवा बँक ठेव (FD) यासारखी तारण द्यावी लागते. त्यामुळे मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायचे असल्यास आधीच कर्ज हमीदार किंवा तारणाची व्यवस्था करून ठेवणे आवश्यक ठरते.
किती कर्जाची आवश्यकता आहे?
कर्ज घेण्यापूर्वी नेमकी किती रक्कम लागणार आहे, याचा अंदाज बांधणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये केवळ कॉलेज किंवा विद्यापीठाचे शुल्क नव्हे, तर वसतिगृह, राहणीमान, प्रवास खर्च, पुस्तके, लॅपटॉप, विमा आणि इतर लहान-मोठे खर्चही समाविष्ट करावेत. फक्त कॉलेजच्या फीवर आधारित कर्ज घेणे टाळावे, कारण परदेशात इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
कर्जाची परतफेड आणि मोरेटोरियम कालावधी
बहुतेक बँका अभ्यास कालावधीत आणि त्यानंतर एक वर्षाचा मोरेटोरियम कालावधी देतात. या कालावधीत कर्जाची मूळ रक्कम परतफेड करावी लागत नाही. मात्र लक्षात घ्यावे की, कर्ज मंजूर झाल्याच्या दिवसापासून व्याज आकारले जाते. मोरेटोरियम कालावधी संपल्यानंतर साधारणपणे १० ते १५ वर्षांच्या आत कर्जाची परतफेड करता येते.
शैक्षणिक रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर
शैक्षणिक कर्जासाठी तुमचा शैक्षणिक रेकॉर्ड आणि सह-हमीदाराचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असल्यास कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. तसेच विविध बँकांनी देऊ केलेल्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासक्रम, विद्यापीठाची मान्यता आणि भविष्यातील नोकरीच्या संधी यावरही व्याजदर अवलंबून असतो.
कर्ज घेणे फायदेशीर ठरेल का?
शैक्षणिक कर्जामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येते. परतफेडीसाठी निश्चित कालावधी मिळत असल्याने आर्थिक नियोजन करता येते. मात्र त्याच वेळी शिष्यवृत्ती, फेलोशिप किंवा पूर्ण निधी असलेल्या योजनांसाठीही अर्ज करणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्जाचा बोजा कमी होईल.
योग्य नियोजन आवश्यक
जर स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर किंवा शिष्यवृत्तीच्या आधारे शिक्षण पूर्ण करता येत असेल, तर अनावश्यक कर्ज घेणे टाळावे. कर्जाचा मानसिक आणि आर्थिक ताण भविष्यात जाणवू शकतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे, तुलना करणे आणि योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.






