
फोटो सौजन्य - Social Media
ही घटना प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आदित्य याच्याशी संबंधित आहे. उन्हाळी सत्रात ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ विषयात अपयशी ठरल्यानंतर त्याने हिवाळी सत्रात पुन्हा परीक्षा दिली होती. त्याचे परीक्षा केंद्र राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या गुणपत्रिकेत लेखी परीक्षेत ‘गैरहजर’ असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे त्याला शून्य गुण देण्यात आले, तर प्रात्यक्षिक परीक्षेत त्याने १५ गुण मिळवले होते. आदित्यच्या म्हणण्यानुसार, तो संबंधित पेपरसाठी प्रत्यक्ष उपस्थित होता. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी त्याने परीक्षा केंद्रावरून हजेरीपत्रकाची प्रत मिळवली असून, त्यावर त्याची उपस्थिती व स्वाक्षरी स्पष्टपणे नमूद आहे. या ठोस पुराव्यानिशी तो सध्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे न्यायासाठी धाव घेत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निकालातील चुका, विलंब आणि गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अशा प्रकारांमुळे धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सध्या संबंधित विद्यार्थी परीक्षा विभागाच्या फेऱ्या मारत असून न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात संबंधित यंत्रणा आणि परीक्षा विभागावर कोणती कारवाई केली जाते, तसेच विद्यार्थ्याला कधी न्याय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा देत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त आणण्याची मागणी आता जोर धरत आहे.