
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (SRTC/ST) 2026 साली मोठी मेगाभरती होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले की, महामंडळात १७ हजार ७४२ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे आणि त्यामुळे राज्यातील एसटी सेवेला आवश्यक मनुष्यबळ मिळेल.
एसटी महामंडळ अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी दरवर्षी ५,००० नवीन बस खरेदी करण्याचे धोरण राबवले जात आहे. या नव्या बस सेवेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. महामंडळाच्या बस ताफेत सध्या लक्षणीय वाढ झाली असून, संपाच्या काळात केवळ १२,५०० बसेस असताना आता १४,००० हून अधिक बसेस उपलब्ध आहेत. दरवर्षी ५,००० नवीन बसेस घेण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे.
भरती प्रक्रियेत २०२२ च्या ऐतिहासिक संपादरम्यान सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे सरकारचा कल आहे. या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या मेगाभरतीत चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी तसेच अन्य सहाय्यक पदांसाठी उमेदवारांची निवड युद्धपातळीवर पार पडण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. यामुळे राज्यातील एसटी सेवा अधिक दर्जेदार, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक होईल.
सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याची संधी तसेच सार्वजनिक परिवहन सेवेत सुधारणा करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या मेगाभरतीमुळे एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळेल आणि सेवांचा विस्तार प्रभावीपणे साधता येईल.