
study
Study Tips to Focus: आजच्या काळात अभ्यासादरम्यान सर्वात मोठे आव्हान पुस्तके नसून मन विचलित होणे हे बनले आहे. अनेक विद्यार्थी पूर्ण ऊर्जेने अभ्यासाला बसतात, पण काही मिनिटांतच त्यांचे लक्ष मोबाईल, सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स किंवा इतर गोष्टींकडे जाते. त्यामुळे तासनतास अभ्यासाला बसूनही ते अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत मात्र काही मुले काही वेळ अभ्यास करूनही उकृष्ट निकाल मिळवतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा ५ पद्धती सांगणार आहोत ज्यांचा अभ्यासात समावेश करून तुमचे अभ्यासावरील लक्ष कधीही विचलित होणार नाही.
सलग अनेक तास अभ्यास करण्याऐवजी २५ ते ३० मिनिटे पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करा आणि नंतर ५ मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. या दरम्यान तुम्ही थोडे चालून येऊ शकता, पाणी पिऊ शकता किंवा डोळ्यांना आराम देऊ शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित छोटे ब्रेक्स घेतल्याने मेंदू ताजातवाना राहतो आणि पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते. सलग न थांबता अभ्यास केल्यास मानसिक थकवा वाढतो आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.
आज अभ्यासाचा सर्वात मोठा शत्रू मोबाईल फोन आणि सोशल मीडियाला मानले जाते. दर काही मिनिटांनी येणारे नोटिफिकेशन्स अभ्यासातील लक्ष पूर्णपणे विचलित करतात. अभ्यास सुरू करण्यापूर्वी फोन सायलेंट किंवा ‘डू नॉट डिस्टर्ब’ (Do Not Disturb) मोडवर ठेवा. शक्य असल्यास मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. जर तुम्ही ऑनलाईन अभ्यास करत असाल, तर फक्त आवश्यक ॲप्सचाच वापर करा आणि बाकी सर्व नोटिफिकेशन्स बंद करा. डिजिटल अडथळे जितके कमी असतील, तितकी एकाग्रता चांगली राहील.
अनेक विद्यार्थी अभ्यासादरम्यान एकाच वेळी अनेक कामे करू लागतात, जसे की गाणी ऐकणे, चॅटिंग करणे किंवा वारंवार विषय बदलणे. तज्ज्ञांच्या मते, मल्टिटास्किंगमुळे मेंदूवर अतिरिक्त ताण पडतो आणि माहिती योग्य प्रकारे लक्षात ठेवणे कठीण होते. त्यामुळे अभ्यासादरम्यान एका वेळी फक्त एकाच विषयावर लक्ष केंद्रित करा आणि आधी तो विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लहान-लहान उद्दिष्टे (टार्गेट्स) ठरवल्याने अभ्यास सोपा आणि प्रभावी होतो.
एकाग्रता आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. जर झोप पूर्ण झाली नाही, तर मेंदू नवीन माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवू शकणार नाही. दररोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच फळे, हिरव्या भाज्या, सुका मेवा, बिया आणि प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील गरजेचे आहे, कारण शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास एकाग्रतेवर थेट परिणाम होऊ शकतो.
दररोज काही मिनिटे ध्यान (मेडिटेशन) किंवा दीर्घ श्वास घेण्याचा सराव केल्याने ताणतणाव कमी होतो आणि मन शांत राहते. यामुळे अभ्यासादरम्यान एकाग्रता वाढण्यास मदत होते. जर ध्यान करणे कठीण वाटत असेल, तर काही मिनिटे फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. याशिवाय, अभ्यास केलेल्या विषयाची नियमित उजळणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या अगदी तोंडावर सर्व अभ्यास एकाच वेळी करण्याऐवजी नियमितपणे विषयांची उजळणी केल्यास माहिती दीर्घकाळ लक्षात राहते आणि परीक्षेची तयारी उत्तम प्रकारे होते.