
फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media
फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, १० फेब्रुवारी रोजी जैतापूर (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील केंद्रावर शिक्षक व पर्यवेक्षकांकडून कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. तसेच बीड तालुक्यातील चौसाळा येथे ड्रोनच्या साहाय्याने कॉपी पुरविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारांमुळे परीक्षा प्रक्रियेतील काही गैरप्रकार अधोरेखित झाले आहेत.
या घटनांप्रकरणी जबाबदार शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई अहवाल सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.
परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील परीक्षेस अपात्र ठरविणे, गुन्हे नोंद करणे, निलंबन व चौकशी अशा कठोर कारवाया करण्यात येऊ शकतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाला सर्वोच्च सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.