
फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवत शिक्षण मंत्रालयाने Central Board of Secondary Education आणि NCERT यांच्या माध्यमातून २०२६ साठी नवीन AI आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या बदलाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पाठांतराऐवजी विचार करण्याची आणि नवीन गोष्टी निर्माण करण्याची सवय लावणे हा आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार पारंपरिक ब्लॅकबोर्डऐवजी आधुनिक व्हाईटबोर्डचा वापर वाढवला जाणार आहे. त्यामुळे वर्ग अधिक स्वच्छ, तंत्रज्ञानस्नेही आणि इंटरॅक्टिव्ह बनतील. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता व्हिज्युअल आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवण्यावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांचा सहभाग आणि लक्ष अधिक वाढेल.
या बदलातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गणितासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि Computational Thinking (CT) शिकवण्याची योजना. सध्या ६वी ते ८वीत याची अंमलबजावणी सुरू असून, पुढील वर्षी ९वी आणि १०वीतही हे विषय शिकवले जाणार आहेत. यामुळे गणिताची भीती कमी होऊन डेटा आणि लॉजिकसोबत काम करण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल.
याशिवाय, शिक्षण आता केवळ इंग्रजीपुरते मर्यादित राहणार नाही. NCERT द्वारे प्रादेशिक भाषांमध्येही अभ्यासक्रम तयार केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही Coding, AI आणि Data Analysis सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत घेता येईल. यामुळे समज अधिक चांगली होऊन शिक्षण अधिक सर्वसमावेशक होईल.
पाठांतरावर आधारित शिक्षण पद्धतीला पूर्णविराम देत आता Critical Thinking आणि Problem Solving वर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना सोशल मीडियामागील अल्गोरिदम कसे काम करतात, हेही शिकवले जाणार आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञानाचे केवळ वापरकर्ते न राहता त्याचे जाणकार बनतील. एकूणच, हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यकालीन नोकऱ्यांसाठी तयार करत असून, भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक आणि कौशल्याधारित बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहे.