
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ संदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्यामुळे हजारो उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होणार असून १६ एप्रिल २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या टीईटी परीक्षेत सुमारे ५० हजार उमेदवार पात्र ठरले होते. मात्र अजूनही अनेक उमेदवार पात्र होऊ शकले नसल्याने त्यांच्यासाठी ही पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.
उमेदवारांना ९ जून ते २१ जून या कालावधीत प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पेपर क्रमांक एक सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत घेतला जाईल. तर पेपर क्रमांक दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
अर्ज भरताना उमेदवारांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. इयत्ता १० वी, १२ वी तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची माहिती मूळ प्रमाणपत्रांनुसार अचूक भरावी. राखीव प्रवर्ग, दिव्यांगत्व यासंबंधीची माहितीही योग्यरित्या नमूद करणे आवश्यक आहे. याशिवाय अर्ज करताना नवीन रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र आणि ओळखपत्र यांचे स्कॅन केलेले प्रती तयार ठेवाव्यात. राज्य परीक्षा परिषदेकडून उमेदवारांशी संपर्क ईमेल आणि एसएमएसद्वारे साधला जाणार असल्याने अर्ज करताना वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती दिल्यास पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. एकूणच, टीईटी २०२६ ही परीक्षा शिक्षक बनण्याची महत्त्वाची पायरी असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून योग्य तयारीसह या संधीचा लाभ घ्यावा.