संग्रहित फोटो
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोमवारी (१४ सप्टेंबर) गणेश चतुर्थी असल्याने गणेशभक्त मोठ्या संख्येने मुंबई, पुणे आणि नाशिकसह विविध भागांतून कोकणाकडे रवाना झाले आहेत. कोकणातील अनेक कुटुंबांमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याने दरवर्षी लाखो चाकरमानी गणपतीसाठी आपल्या गावी जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. इंदापूर आणि माणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, सुमारे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत असल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते वाहतुकीसोबतच कोकणाकडे जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या उत्साहात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाला राजापूर येथील या अपघातामुळे गालबोट लागले आहे.






