
फोटो सौजन्य: iStock
ही घटना सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत घोडेगावातील एका खासगी दवाखान्यात घडली. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि गावठी कट्ट्यांतून गोळीबार करण्यात आला. आरोपींनी नितीन शिरसाठ यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांना तत्काळ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सूरज फुलमाळी याला प्रथम अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. दरम्यान, अहिल्यानगरमधील रुग्णालय परिसरात दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला; मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी मृत नितीन शिरसाठ यांच्या पत्नी स्वाती नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुलाब सादिक फुलमाळी, सूरज फुलमाळी, आकाश अण्णा फुलमाळी, कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी व भारत यल्लाप्पा फुलमाळी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात घडलेली ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. काही दिवसांपूर्वी अमळनेर येथे गोळीबार झाला होता. तसेच सोनई-कांगोणी रस्त्यालगत वडघुले वस्तीवर एका तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच घोडेगावातील गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी व स्थानिक पोलिस करीत आहेत. घोडेगावातील टोळीयुद्ध पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नेवासा तालुका गावठी कट्ट्यांसाठी कुप्रसिद्ध होत असल्याची चर्चा आहे. राज्याबाहेरून अवैध शस्त्रांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन ते तीन हजार रुपयांत सहज उपलब्ध होणारे गावठी कट्टे गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. वाळूतस्करी, चंदनतस्करी यांसारख्या अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशामुळे गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अवैध शस्त्रसाठ्यावर कठोर कारवाई करणे आणि गुन्हे अन्वेषण पथकाला अधिक बळ देणे, अशा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.