वसई विरार परिसरात एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आजारपण व नैराश्य ही संभाव्य कारणे असू शकतात. संबंधित प्रकरणांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. मृतांमध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
या दुर्दैवी घटनांमध्ये भूषण सुर्वे (३३), शंभूनाथ दुबे (५०), जोया खान (१०), शुभांगी शर्मा (४३), जहीरूननिशा आलम (१५) आणि वत्सल (२३) यांचा समावेश आहे. एकाच दिवशी सहा जणांनी जीवन संपवल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…
नालासोपारा येथील वकनपाडा परिसरात राहणाऱ्या जोया खान (१०) हिने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. तिच्या वडिलांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे कुटुंबीयांसह परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे.
वसईतील रॉयल सायलंट परिसरात राहणाऱ्या जहीरूननिशा आलम (१५) हिनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद आहे. ती नववी इयत्तेत शिकत होती. शाळा सकाळी लवकर असल्याने तिला उठण्यास अडचण येत होती. गेल्या महिन्याभरापासून ती शाळेत जात नव्हती. काही दिवसांत वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्याने ती मानसिक तणावाखाली होती. आई-वडील घरी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांत नैराश्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून समुपदेशन व जनजागृती उपक्रम राबवले जात असले तरी ते प्रभावीपणे संबंधितांपर्यंत पोहोचत नसल्याची बाब समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, कुटुंबीयांनी मुलांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्या भावनिक स्थितीकडे लक्ष देणे आणि शाळा-कॉलेजांनी समुपदेशन व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.






