
ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची लाचखोरी; आदर्श गावच्या महिला सरपंचाने घेतली लाच
वाशिम : जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ख्याती असलेल्या ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचास 25 हजारांची लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शिरपूर पोलिसात सरपंच सुनीता मिटकरी तसेच सरपंच पती दत्तात्रेय उर्फ बबन मिटकरी यांच्याविरोधात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच व त्यांच्या पतीने एका प्रकरणात २५ हजारांची लाच मांगितली. तक्रारदाराला ग्राम ढोरखेडा येथे नाली बांधकामाचे काम मिळाले होते. सदर बांधकाम विहित कालावधीत पूर्ण करण्यात आले. बांधकामाचे मंजूर झालेल्या बिलाचे हस्तांतरण पावतीवर सरपंचाची स्वाक्षरी व शिक्का देण्याकरिता खाजगी व्यक्ती सरपंच यांचे पती दत्तात्रेय उर्फ बबन मिटकरी यांनी तक्रारदारांना पैशांची मागणी केली. त्यांनी मंजूर रकमेच्या १० टक्के रक्कम म्हणजे ४० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालय येथे प्राप्त झाली.
घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई
दरम्यान, तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईमध्ये इतर खाजगी व्यक्ती मिटकरी यांनी तक्रारदार यांना हस्तांतरण पावतीवर सरपंच यांची सही व शिक्का देण्याकरिता २५ हजार रुपये लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तसेच सरपंचांनी देखील त्यांचे लाच मागणीस सहमती दर्शवली.
याबाबत वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रचण्यात आलेल्या सापळ्यात खाजगी व्यक्ती व सरपंच यांच्याविरुद्ध गुरुवारी सापळा रचून कारवाई केली. त्यामध्ये मिटकरी यांनी लाच मागणी केल्याप्रमाणे सरपंचांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. त्याचप्रमाणे आरोपीचे ताब्यातून रक्कम २५ हजार रुपये ताब्यात घेण्यात आले.
राज्यभरात आदर्श सरपंच म्हणून होती ख्याती
ढोरखेडा ग्रामपंचायतीला गेल्या दहा ते बारा वर्षात आदर्श ग्रामपंचायत शासनाचे सुमारे डझनावर पुरस्कार मिळाले आहेत. परिणामी, वाशिम जिल्ह्यातच नव्हे राज्यभरात एक आदर्श सरपंच म्हणून या गावाचा नावलौकिक होता. विशेष म्हणजे यावेळीही तालुका पातळीवर प्रथम आल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी करणारे पथकसुद्धा या कार्यवाहीवेळी ढोरखेडा येथेच उपस्थित होते. गावापासून ते राज्यभरापर्यंत नावाजलेल्या ग्रामपंचायतमध्येसुद्धा भ्रष्टाचाराचा प्रकार घडू शकतो. हे ऐकताच अनेकांना धक्का बसला असून, जिल्हाभरात खळबळ उडाली.