
मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खाजगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या एका वाहनाना त्यांच्या एक्सप्रेसवेवरील गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या गाडीचा पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला. यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात कसा आणि कधी झाला, त्याचे नेमके कारण काय, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात दिलीप धोत्रे यांच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. विशेषतः पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यात मनसेची बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच मनसे कार्यकर्त्यांनी खळबळ उडाली आहे. अनेकांनी पुण्याच्या दिशेने धाव घेतल्याचेही समजते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात नेमका कशामुळे झाला, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने की अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या
दिलीप धोत्रे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून केली. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या धोत्रे यांनी १९९२ मध्ये पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद भूषवत आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवली होती. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून सर्वप्रथम त्यांना साथ देणारे ते महत्त्वाचे शिलेदार ठरले. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. याच निष्ठेची दखल घेत नुकतीच त्यांची पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागली होती.