
Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर...
हेही वाचा:Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक खोलीत गेले अन्…
किरण नरोडे एका कंपनीत मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. गणेशोत्सवानिमित्त कंपनीत गणरायाची स्थापना करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी ते कंपनीत गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते अंबडहून दुचाकीवरून मुंबई नाक्याच्या दिशेने येत होते. याचदरम्यान भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर किरण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. ट्रक कोणत्या दिशेने गेला, तसेच त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध मार्गांवरील फुटेजची पाहणी केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कंपनीतील गणरायाच्या स्थापनेच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या किरण यांचा परतीच्या प्रवासात अपघाती मृत्यू झाल्याने नरोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.