
Accident News : रांजणगावात रॅम्पमध्ये चिरडून टेम्पो चालकाचा मृत्यू; टेम्पोचा पडदा बांधताना...
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील ब्रिटानिया कंपनीमध्ये टेम्पोचा पडदा बांधताना टेम्पो पाठीमागे आला. तेव्हा टेम्पो व रॅम्पमध्ये चिरडून टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ही घटना रांजणगावात घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दिलीप आत्माराम राठोड असे सदर मृत चालकाचे नाव आहे.
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील ब्रिटानिया कंपनीमध्ये टेम्पोचालक दिलीप राठोड हा (एमएच १२ टीव्ही २४१९) हा टेम्पो घेऊन आलेला असताना टेम्पोमध्ये मटेरियल भरल्यानंतर टेम्पोच्या पाठीमागील पडदा बांधत असताना अचानक टेम्पो पाठीमागे आला आणि कंपनीच्या रॅम्पवर आदळला. यावेळी टेम्पो चालक दिलीप राठोड हा टेम्पो व रॅम्पमध्ये चिरडला गेला.
दरम्यान, नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिरूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दिलीप आत्माराम राठोड (वय ३४, रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे) याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घडलेल्या प्रकाराबाबत अभिजीत माधव मलगुंडे (वय ३१, रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.
समृद्धी महामार्गावर काळाचा कहर
समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. वर्धाच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून, यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. यामुळे हा भीषण अपघात घडला.
महिला वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडले
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात पंढरपूर आषाढी एकादशीच्या यात्रेला निघालेल्या महिला वारकऱ्यांच्या एका गटाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या भीषण रस्ते अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जणी गंभीर जखमी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसान भरपाईची घोषणा केली.