pune congress leader target bjp
पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. प्रमुख लढत ही महायुती व महाविकास आघाडीमध्ये होणार असल्यामुळे नेत्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पुण्यामध्ये कॉंग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
महागाई, बेरोजगारी, असुरक्षितता तसेच अन्याय-अत्याचाराच्या घटनांना वैतागलेली जनता आगामी विधानसभा निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाला घरचा रस्ता दाखवेल. लाडक्या बहिणींना फुकटचे दीड हजार नको आहेत, तर त्यांच्या हाताला काम आणि सुरक्षित वातावरण अधिक महत्वाचे आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली. ‘एकी हेच बळ’ समजून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले असल्याचेही सुरवसे पाटील म्हणाले.
शाळा-महाविद्यालयातील मुलींची तसेच राज्यात सर्वत्र महिला सुरक्षा महायुती सरकारच्या काळात रामभरोसे झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून भीक नको, पण हाताला काम द्या, असा सूर आता सर्वसामान्य जनतेतून उमटू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने काँग्रेसला साथ दिली. आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. भाजप सरकार जनतेला धार्मिक व जातीयवादी मुद्द्यांवर भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, भूलथापांना आता महागाईने पिचलेली जनता भीक घालणार नाही. ईडी, सीडी, आयकर विभागाची भीती दाखवून, पक्ष फोडून सत्ता मिळवणाऱ्यांना आता जनता घरी बसवणार, हे दिसत आहेत. सर्वसामान्य जनतेने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हातात घेतली आहे, असेही सुरवसे-पाटील यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : अखेर एकनाथ खडसेंनी घेतली महाविकास आघाडीची बाजू; व्यक्त केला विजयाचा विश्वास
आम्हाला आश्वासन नको, न्याय हवा आहे. सामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या काँग्रेस सरकारची गरज आहे, हीच भावना जनमाणसामध्ये निर्माण झाली आहे. महागाईने कष्टकरी, कामगारांना दिवाळीचे दोन घाससुद्धा खाता येईना अशी परिस्थिती आज झाली आहे. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन महागाई गगनाला भिडवणाऱ्या सरकारला नेस्तनाबूत करायची वेळ आली आहे. ‘उठा उठा मतदान करा आणि भाजप सरकार हद्दपार करा’ अशी ठोस भूमिका जनतेने घेतल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांना मदत करण्यापेक्षा एकदिलाने काँग्रेस मजबुतीकरणासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आणि जनहिताचे ठरणार आहे.
– रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस