
फोटो सौजन्य - Social Media
नवराष्ट्र वाहिनीशी संवाद साधताना रिंकू म्हणते की, “खूप लहानपणीची गोष्ट आहे. जेव्हा मी 3 ते 4 वर्षांची होती. मी अकलूज येथील असल्यामुळे आमच्या इथे वारकऱ्यांचं रिंगण भरायचं. माझे वडील शिक्षक आहेत. त्यावेळी वारकरी त्यांच्याच शाळेमध्ये राहण्यासाठी यायचे. मी वडिलांबरोबर शाळेत जायचे. वारकऱ्यांना जेवण वाढायचे. त्यांचे झेंडे घेऊन संपूर्ण परिसर फिरायचे. तेव्हापासून आमच्यात कनेक्शन आहे. पण म्हणतात ना काही गोष्टी समजायला वेळ लागतात. मला ही या गोष्टी उशिरा उमजल्या.”
रिंकू सोलापूरची असल्यामुळे पंढरपूर अगदी जवळ! लहानपणीच्या वारकऱ्यांसोबतच्या आठवणी तिने या मुलाखतीत शेअर केल्या. अगदी वारकरी रिंकूच्या घरी जेवणासाठीही येत असत. रिंकू म्हणते की “विठ्ठल माझा मित्र आहे. परंतु, या गोष्टींची जाणीव होण्यासाठी फार उशीर लागला.”
नुकतंच रिलीज झालं भक्तीगीत!
अभिनेत्री रिंकू राजगुरू पहिल्यांदाच ‘बाप विठुराया’ या वारी विशेष अल्बम गीतातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विठ्ठलभक्ती आणि वारीची भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यात रिंकूचा पारंपरिक आणि भावपूर्ण अंदाज पाहायला मिळतो. या प्रोजेक्टमुळे तिचं विठ्ठल आणि भक्तीशी असलेलं नातं अधिक घट्ट झाल्याची भावना तिने व्यक्त केली. सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रिंकूच्या नव्या रूपाचंही कौतुक होत आहे.