
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Hema Malini : ‘बटवारा 1947’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी आणि करण देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला असून, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
हेमा मालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केली. त्यांनी सनी देओल आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं. तसेच करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही चांगलं काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेमा मालिनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “मी काल ‘पार्टिशन’ चित्रपट पाहिला. तो खरोखरच अप्रतिम आहे आणि आज देशाला कशाची गरज आहे, याचा स्पष्ट संदेश देतो.”
पुढे त्यांनी लिहिलं, “हा चित्रपट आपल्याला आठवण करून देतो की द्वेष आणि विभाजनापेक्षा माणुसकी, परस्पर आदर आणि बंधुत्व अधिक महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की चित्रपटाचा सुंदर संदेश लोकांना त्यांची विचारसरणी बदलण्यास आणि द्वेषाऐवजी करुणा व दयाळूपणा निवडण्यास प्रेरित करेल.”
चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, “राजकुमार संतोषी यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट आहे आणि सनी देओल व शबाना आझमी यांचा अभिनय अप्रतिम आहे. करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही चांगलं काम केलं आहे.”
तसंच, चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी आमिर खानचं अभिनंदन केलं. “असा कालातीत चित्रपट बनवल्याबद्दल आमिर खानचं अभिनंदन. या चित्रपटातील संदेशाची आज खरोखरच गरज आहे,” असं हेमा मालिनी यांनी म्हटलं.
‘बटवारा 1947च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सनी देओलचे वडील आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचाही उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ‘बटवारा 1947 हा धर्मेंद्र यांनी पाहिलेला शेवटचा चित्रपट होता.
राजकुमार संतोषी यांनी सांगितलं होतं की, धर्मेंद्र यांनी चित्रपट पाहिल्यानंतर ते खूप भावुक झाले होते. चित्रपटाची कथा ऐकतानाही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्यांनी संपूर्ण टीमला आशीर्वाद दिला होता. संतोषी यांच्या मते, धर्मेंद्र यांनी चित्रपट पाहिल्यानंतर तो मोठा हिट होईल, असा विश्वासही व्यक्त केला होता.
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. त्यांना सनी देओल, बॉबी देओल आणि विजेता व अजिता या दोन मुली अशी चार मुलं आहेत. त्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.