
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jayanti 2 Marathi Movie: २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित प्रभावी कथानकातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल पाच वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘जयंती २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच चित्रपटाचे अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.
मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ प्रस्तुत ‘जयंती २’ची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांनी केले आहे. पहिल्या भागातील प्रमुख चेहरा ऋतुराज वानखेडे पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
चित्रपटाचे छायांकन संजीवकुमार हिल्ली यांनी केले असून, संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरु यांनी गीतलेखन केले असून, संगीत ओंकारस्वररूप यांचे तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.
‘जयंती’च्या पहिल्या भागाने समाजप्रबोधनाचा वेगळा विषय प्रभावीपणे मांडत विशेषतः तरुण प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. सामाजिक विचारांना चालना देणाऱ्या या चित्रपटामुळे सिक्वेलबाबतही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
चित्रपटाच्या पोस्टरपासूनच ‘जयंती २’ची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी संत्या कोणतं नवं आणि ज्वलंत आव्हान स्वीकारणार, कथेला कोणतं नवं वळण मिळणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
याबाबत दिग्दर्शक शैलेश नरवाडे म्हणाले, “‘जयंती २’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता कथानक कोणत्या दिशेने पुढे जाईल, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट निश्चितच आवडेल, याची मला खात्री आहे.”