
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
“पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते,” या अर्थपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीकडे सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित नसून, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा वेध घेणारे असेल, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन अशुतोष पोपट जरे यांनी केले असून, डॉ. उमेश आजगावकर, नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी आणि स्वाती दिवे मुखर्जी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. आशयपूर्ण कथानक, प्रभावी सादरीकरण आणि भावविश्वाचा सुरेख मिलाफ साधत हे नाटक प्रेक्षकांना वेगळा नाट्यअनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिग्दर्शक अशुतोष पोपट जरे म्हणाले, “‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ ही केवळ पंढरीच्या वारीची कथा नाही, तर प्रत्येकाच्या अंतर्मनात सुरू असलेल्या प्रवासाची गोष्ट आहे. श्रद्धा, नाती, संघर्ष आणि आत्मशोध यांचा वेध घेणारा हा अनुभव रंगभूमीवर साकारताना प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी कलाकृती सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
निर्माते सचिन अवस्थी म्हणाले, “मराठी रंगभूमीवर दर्जेदार आणि आशयपूर्ण कलाकृती सादर करण्याची समृद्ध परंपरा आहे. त्याच परंपरेला साजेशी कलाकृती म्हणून ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ प्रेक्षकांसमोर आणत आहोत. हे नाटक प्रेक्षकांना भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर नक्कीच जोडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
आषाढी एकादशीच्या (aashadhi ekadashi) शुभदिनी झालेल्या या घोषणेनंतर रंगप्रेमी आणि विठ्ठलभक्तांमध्ये नाटकाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रद्धा, जीवनमूल्ये आणि अंतर्मनातील प्रवासाची अनुभूती देणारे ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.