
फोटो सौजन्य - Social Media
मराठी रंगभूमी सध्या नव्या विचारांनी, तरुणाईच्या ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी अधिक समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक कथानकांच्या चौकटी मोडून आजचे तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, बदलती सामाजिक मानसिकता आणि नव्या पिढीच्या भावविश्वावर आधारित वेगळे प्रयोग रंगमंचावर साकारत आहेत. अशाच नव्या विचारांच्या वाटेवरून येणारं ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांनी नवोदित कलाकारांना व्यासपीठ देत या नाटकाची निर्मिती केली आहे.
या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक Sachin Pilgaonkar यांनी उपस्थित राहून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. नव्या कलाकारांमुळे रंगभूमीवर ताजी ऊर्जा निर्माण होते आणि मराठी नाट्यव्यवसायासाठी हे सकारात्मक पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ या नाटकाची टॅगलाईन आहे “Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!” शुक्रवार १५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता ठाण्यातील Gadkari Rangayatan येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. बदलती कौटुंबिक नाती, तरुणाईचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडणार आहे.
निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले की, “आजच्या तरुण पिढीचे विचार आणि नात्यांकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना संधी देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.” दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर यांनीही हे नाटक समाजातील वास्तव विनोदातून मांडणारे असून प्रत्येक पात्र प्रेक्षकांना स्वतःशी जोडून घेईल, असे सांगितले.
या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखन आणि संगीत चैतन्य कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन श्रेयस इंदापूरकर यांनी केले आहे. अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजातील गाण्यांमुळे नाटकाला विशेष रंगत आली आहे. ठाण्यानंतर या नाटकाचे प्रयोग कल्याण, वाशी, दादर आणि माटुंगा येथेही रंगणार असून मराठी रंगभूमीवर नव्या कलाकारांचा हा ताजा प्रयोग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.