
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aai Tuljabhavani: ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये सध्या भक्तीमय चातुर्मास पर्व सुरू आहे. श्रावण महिन्याच्या आणि नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर मालिकेत एक रंजक आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेत लाडकी ‘इंदू’ची भूमिका साकारणारी बालकलाकार सांची भोयर आता ‘आई तुळजाभवानी’मध्ये लहान तुळजाईच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येत्या १३ ऑगस्टपासून प्रेक्षकांना मालिकेत तुळजाईच्या बालरूपाची अद्भुत लीला पाहायला मिळणार आहे. कथानकानुसार, देवी वाड्यात कुठेच सापडत नसताना भक्तांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो—“ही दिव्य पोथी कोण उघडणार?”
त्याचवेळी गर्दीतून एक दहा-बारा वर्षांची निरागस, तेजस्वी आणि बुद्धिमान मुलगी पुढे येते. ती शांतपणे “मी उघडते…” असं म्हणत पायऱ्या चढते आणि देवीच्या मुख्य आसनावर जाऊन बसते. त्यानंतर ती पोथीवर हात ठेवताच त्यातून सुवर्णप्रकाश बाहेर पडतो आणि रिकाम्या पानांवर दिव्य अक्षरं उमटू लागतात.
पद्मा या मुलीला ती नेमकी कोण आहे, असा प्रश्न विचारते. त्यानंतर या बालिकेचं रूपांतर साक्षात आई तुळजाभवानीच्या भव्य आणि दिव्य रूपात होतं. नऊवारी साडी, सुवर्ण अलंकार, मुकुट, हातातील त्रिशूळ आणि कपाळावरील मळवट अशा देवीच्या रूपात सांची भोयर दिसणार आहे.
या दैवी रूपातून आई तुळजाभवानी नागपंचमीची कथा सांगणार आहे. लहान मुलीच्या रूपात आलेली ही बालिका साधी मुलगी नसून साक्षात तुळजाईचं बालरूप असल्याचं अखेर उलगडणार आहे. मात्र, तुळजाईने ही लीला का रचली आहे आणि वाड्यात बालरूप धारण करून येण्यामागचा तिचा नेमका उद्देश काय आहे, हे आगामी भागांत स्पष्ट होणार आहे.
‘छोटी तुळजाई’ची भूमिका साकारणं माझ्यासाठी जबाबदारीची भावना – सांची भोयर
या भूमिकेबद्दल बोलताना सांची भोयरने आपला अनुभव शेअर केला. ‘इंद्रायणी’नंतर पुन्हा ‘कलर्स मराठी’च्या कुटुंबात परतताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप आनंद झाला, असं तिने सांगितलं.
‘छोटी तुळजाई’ हे केवळ एक पात्र नसून महाराष्ट्राच्या श्रद्धेशी जोडलेलं बालदैवी रूप असल्यामुळे ही भूमिका स्वीकारताना वेगळीच जबाबदारी जाणवली, असंही सांचीने म्हटलं. ‘इंदू’ ही साधी मुलगी होती, तर ‘लहान तुळजाई’च्या भूमिकेत बालपणासोबत देवत्वाचा समतोल साधण्यासाठी तिने संवादफेक आणि देहबोलीवर विशेष मेहनत घेतल्याचं सांगितलं.
पोथी वाचतानाचा आणि त्यानंतर दैवी रूपात रूपांतरित होतानाचा अनुभव रोमांचक असल्याचं सांचीने सांगितलं. ‘इंद्रायणी’मधून मिळालेल्या प्रेमाप्रमाणेच या नव्या आणि पवित्र भूमिकेलाही महाराष्ट्रातील प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
मालिकेच्या कथानकात तुळजाईच्या बालरूपाच्या आगमनामुळे मोठं वळण येणार आहे. भक्तांची श्रद्धा आणि आत्मविश्वासाची परीक्षा पाहण्यासाठी तुळजाई बालिकेचं रूप धारण करून वाड्यात प्रवेश करते. आता बालरूपातील आई तुळजाभवानी नागपंचमीची दिव्य कथा कशी उलगडणार आणि तिच्या या लीलेमागचं रहस्य काय आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.