
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सीझन सध्या प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेचा विषय ठरत आहे. घरातील डावपेच, रणनीती, वाद-विवाद आणि टास्क यांसोबतच आता स्पर्धकांचे खरे, भावनिक पैलूही हळूहळू समोर येऊ लागले आहेत. कॅमेऱ्यांसमोर मजबूत भासणारे हे स्पर्धक प्रत्यक्षात किती संवेदनशील आहेत, याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत आपल्या माणसांची, विशेषतः आई-वडिलांची आठवण येणं हे अत्यंत साहजिक आहे. हाच भावनिक क्षण सध्या घरातील सदस्य करणच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. अलीकडील एपिसोडमध्ये करण आपल्या आई-वडिलांच्या आठवणीने भावूक झालेला दिसून आला.
नेमकं काय घडलं?
घरात शांत क्षण असताना दिपाली करणची आपुलकीने विचारपूस करताना दिसत आहे. “बिग बॉसच्या घरात कसं वाटतंय? बरं आहे ना?” असा साधा प्रश्न विचारताच करणच्या भावनांना वाट मोकळी होते. तो मन मोकळं करत सांगतो की, “मला मध्ये मध्ये आई-बाबांची खूप आठवण येते. मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे. ते ठीक आहेत ना, एवढंच जाणून घ्यायचं आहे.”
करण पुढे सांगतो की, त्याचं संपूर्ण जग आई-वडिलांच्या भोवती फिरतं. बाहेरच्या आयुष्यात घर नेहमी गजबजलेलं असायचं. लोकांची सतत ये-जा, रिल्स बनवणं, कामाच्या गडबडीतही आई-बाबांचा सहवास असायचा. तीच गजबजलेली दुनिया अचानक थांबली आहे आणि आता त्या सवयीची, त्या उबदारपणाची खूप उणीव जाणवत असल्याचं तो सांगताना दिसत आहे. तसेच तो पुढे म्हणतो, “मला फक्त एकदाच त्यांचा आवाज ऐकायचा आहे. की ते ठीक आहेत ना, हे जाणून घ्यायला फक्त १० सेकंद मिळाले तरी पुरेसे आहेत,” असं म्हणताना करणच्या डोळ्यांत पाणीआलेलं दिसून आले.
रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका
प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला क्षण
बिग बॉसचं घर म्हणजे सतत तणाव, डावपेच आणि संघर्षाचं मैदान. मात्र अशा वातावरणात करणचा हा संवेदनशील आणि प्रामाणिक अवतार पाहून प्रेक्षकही भावूक झाले झालेले दिसून आले. सोशल मीडियावर चाहत्यांकडून करणसाठी सहानुभूतीचा वर्षाव होत असून, “हा खरा करण आहे”, “आई-वडिलांवरचं प्रेम दिसतंय” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. नेहमी मजबूत, आत्मविश्वासू आणि खेळात पुढे असणारा करण या क्षणी एक हळवा, प्रेमळ मुलगा म्हणून समोर आला. बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये अशा भावनिक क्षणांमुळे शोला वेगळीच उंची मिळत असून, प्रेक्षकांचा स्पर्धकांशी भावनिक कनेक्ट अधिक घट्ट होत चालला आहे.