
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Zee Marathi Artists Ganeshotsav: गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि आपुलकी घेऊन येणारा सण आहे. बाप्पाचं घरी आगमन, आरती, मोदक, सजावट, कुटुंबीयांसोबतचे क्षण आणि बाप्पाच्या दर्शनातून मिळणारं समाधान, या सगळ्यांमधून प्रत्येकाच्या मनात या सणाच्या अनेक खास आठवणी जपलेल्या असतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त झी मराठीच्या कलाकारांनी त्यांच्या घरातील गणेशोत्सवाच्या तयारीपासून ते बाप्पासोबतच्या खास आठवणी आणि अनुभवांपर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
कुणासाठी बाप्पाचं घरात आगमन हा सर्वात आनंदाचा क्षण आहे, तर कुणासाठी लहानपणीच्या आठवणी आणि वर्षानुवर्षे जपलेल्या परंपरा खास आहेत. काही कलाकारांसाठी बाप्पासोबतचं नातं हे श्रद्धा आणि विश्वासाचं आहे.
‘कमळी’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री विजया बाबर हिच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे कुटुंबीयांसोबतचा आनंद आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याची संधी. यंदाही त्यांच्या कुटुंबात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
विजया सांगते, “माझी ताई, जीजू, दादा, वहिनी, मी आणि फॅमिली मेंबर्स असा आमचा ग्रुप आहे. डेकोरेशन, बाप्पाच्या मूर्तीचं सिलेक्शन अशा अनेक विषयांवर आमच्या चर्चा आणि आयडिया सुरू असतात. आमच्याकडे गणेशोत्सव खूप छान आणि अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.”
गणेशोत्सवातील रात्रभर जागून केलेलं डेकोरेशन तिला विशेष आवडतं. मात्र, तिच्यासाठी गौरी आगमन आणि गौरीचं जेवण हे त्याहूनही खास असतं. गौरीच्या आगमनाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत स्वागत केलं जातं. त्यानंतर गौरीला दागिने घालण्यापासून सजवण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण कुटुंबासाठी खास असतो.
गौरीच्या जेवणाच्या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजी आणि गोडधोड असा खास नैवेद्य केला जातो. रात्री गौरी-गणपती जागरणात मंगळागौरीचे खेळ खेळले जातात.
गौरी जागरणाच्या दिवशी आई देवीला लेक म्हणून संबोधत गाणं म्हणते आणि तिची सासरी पाठवणी केली जाते. या क्षणाबद्दल विजया म्हणते की, “त्या वेळी आम्ही सगळेच खूप इमोशनल होतो. माझ्या अंगावर आताही सांगताना काटा येतोय.”
‘सनई चौघडे’ मालिकेतील तेजस्विनी खानोलकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती सारंगधर हिच्यासाठीही गणेशोत्सवाच्या अनेक खास आठवणी आहेत. मुलगा झाल्यानंतर घरी गणपती बाप्पाला आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. सुरुवातीला एका वर्षासाठी बाप्पाची स्थापना करण्याचा विचार होता; मात्र हा उत्सव तब्बल सात वर्षे सुरू राहिला.
अदिती सांगते, “बाप्पाला नैवेद्य चढवण्याचा, आपल्या हातचं बनवून लोकांना जेवायला देण्याचा, त्यांचं अगत्य करण्याचा आणि आरती म्हणतानाचं ते मंगलमय वातावरण अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच होता.”
सात वर्षांनंतर त्यांनी गणपती बाप्पाचं उद्यापन केलं. सध्या त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत नसली तरी त्या मित्र-मैत्रिणींच्या घरी दर्शनासाठी जातात.
अदितीने बाप्पासोबतच्या एका भावनिक अनुभवाचीही आठवण सांगितली. नाना पाटेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेली असताना बाप्पाच्या मूर्तीकडे पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. “वाटत होतं बाप्पा डोळ्यात डोळे घालून आपल्याशी संवाद साधतोय आणि सांगतोय, ‘सगळं ठीक आहे, जे काही चाललंय ते मला समजत आहे, सगळं छान होईल.’ तेव्हापासून बाप्पाशी एक वेगळं नातं निर्माण झालं,” असं ती सांगते.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून अदिती आणि तिचं कुटुंबीय गणेशोत्सव एका वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. कुटुंबीय आणि मुलं एकत्र येऊन माती आणतात, स्वतःच्या हाताने छोटासा बाप्पा बनवतात, त्याला रंगवतात आणि सोसायटीमध्ये त्याची स्थापना करतात.
यामुळे मुलांना गणेशोत्सवाचं महत्त्व समजावं आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागे मांडलेला ‘सर्वांचा बाप्पा’ हा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, असा त्यांचा प्रयत्न आहे.
अदितीसाठी गणपती म्हटलं की उकडीचे मोदक, जास्वंदीचं लाल फूल, आरास आणि भरपूर आरत्या आठवतात. लहानपणी चाळीत वेगवेगळ्या घरांमध्ये आरतीसाठी जाण्याच्या आठवणीही तिच्या मनात आजही ताज्या आहेत.
निखिल दामलेला आईच्या हातचे मोदक प्रिय
‘ऋषी’ या भूमिकेमुळे ओळखला जाणारा अभिनेता निखिल दामले पुण्यातील पारंपरिक गणेशोत्सवाच्या आठवणींमध्ये रमतो. त्यांच्या घरी गणपतीची स्वतंत्र मूर्ती आणली जात नाही. घरातील चांदीच्या मूर्तीचं दरवर्षी पूजन केलं जातं.
निखिलसाठी गणेशोत्सवातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे आईच्या हातचे उकडीचे मोदक. पुण्याला जाऊन मोदक खाण्याची तो आतुरतेने वाट पाहत असतो.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात, गप्पा रंगतात, पत्ते खेळले जातात आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं, ही गोष्टही त्याला विशेष आवडते.
बाबांसोबतच्या गणपती दर्शनाची आठवण
निखिलने लहानपणीची एक खास आठवणही शेअर केली. त्याचे बाबा त्याला वेगवेगळ्या गल्ल्यांमधील आणि गणेश मंडळांमधील बाप्पांचं दर्शन घडवण्यासाठी घेऊन जायचे. गर्दीतून वाट काढताना ते निखिलला खांद्यावर बसवून घेऊन जायचे.
कॉलेजमध्ये असताना निखिलने एका मंडळाच्या जिवंत देखाव्यातही सहभाग घेतला होता. मित्रांसोबत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला होता. विसर्जनाच्या दिवशी अलका टॉकीजजवळील चौकात सादर केलेला हा पोवाडा त्याच्यासाठी आजही अविस्मरणीय आठवण आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांनी शेअर केलेल्या आठवणींमधून बाप्पासोबतचं त्यांचं भावनिक नातं, घरातील परंपरा आणि कुटुंबीयांसोबत साजरे केलेले आनंदाचे क्षण समोर येतात. प्रत्येकाची गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली, तरी बाप्पावरील श्रद्धा आणि आपुलकीचा धागा मात्र सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो.