
Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Gauri Ganpati Festival: गणपती बाप्पा आले की सगळीकडे आनंद असतो. बाप्पा आला की दोन-तीन दिवसातच आपल्या लाडक्या गौरी पण येतात. महाराष्ट्रात गौरी-गणपतीचा सण खूप मोठा आहे. गौरीला आपण फक्त देवी नाही मानत, तर माहेरवाशीण लेक मानतो. लेक माहेरी आली की जसं स्वागत करतो तसंच गौरीचं करतो. गौरीला अनेक घरात पार्वती तर अनेक घरात महालक्ष्मी मानतात. ती आली की घरात सुख, पैसा, सौभाग्य येतं अशी श्रद्धा आहे. पण जर तुमच्या घरी पहिल्यांदाच गौरी बसवणार असाल तर थोडं टेन्शन येतं. कसं करायचं, कुठून आणायच्या, काय करायचं? चला तर मग सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया.
सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, गौरी बसवायला एकच नियम नाही. प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. तुमच्या आई, आजी कशा बसवायच्या, कोणता नैवेद्य करायच्या, हे आधी विचारून घ्या. दुसऱ्याच्या घरात बघून तसंच करायला जाऊ नका. आपला कुलाचार काय आहे हे आधी घरातल्या मोठ्या माणसांना किंवा आपल्या गुरुजींना विचारा. तेच खरं आहे. Gauri Ganpati 2026:
बऱ्याच घरात पहिली गौरी माहेरहून आणतात. काही ठिकाणी जवळच्या नातेवाईकाकडून आणतात. काही जण सासरच्या पद्धतीने आणतात. म्हणजे असं नाही की याच व्यक्तीकडून घेतल्या पाहिजेत असा नियम आहे. तुमच्या घरात आधीपासून जी पद्धत आहे तीच पुढे चालू ठेवा. जर नवीन घर असेल तर मोठ्या माणसांना विचारून ठरवा.
?गौरी घरी येणार म्हणजे लक्ष्मीच घरी येणार. त्यामुळे घर आधी स्वच्छ करा. दारात छान रांगोळी काढा, तोरण लावा. गौरी आणताना आनंदाने आणा. बऱ्याच घरात दारापासून देवघरापर्यंत गौरीची छोटी-छोटी पावलं काढतात. गौरी उंबरठा ओलांडून घरात सुख घेऊन येते असं मानतात.काही घरात तर गौरीला घर दाखवतात, खास करून स्वयंपाकघर. आपली लेक आलीय, तिला घर दाखवायचं, याच भावनेने हे करतात. ही खूप छान परंपरा आहे.
Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
गौरी आली की तिला छान नटवायचं असतं. त्यासाठी नवीन साडी, दागिने, हार, गजरा, फुलं लागतात. कुंकू, हळद, अत्तर हे पण तयार ठेवा. गौरी ही सौभाग्याचं रूप आहे म्हणून बांगड्या, कुंकू याला जास्त महत्त्व आहे. कोणती साडी नेसवायची हे पण घराच्या पद्धतीनुसार ठरतं.
ज्यांच्याकडून गौरी आणता त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. त्यांना वाण म्हणून काहीतरी द्यायचं असतं. वाणात तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ, फळं, सौभाग्याच्या वस्तू देऊ शकता. हे पण प्रत्येक घरात वेगळं असतं.
बऱ्याच घरात दोन गौरी बसवतात. एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा. म्हणजे दोन बहिणी. दोघींची वेगळी पूजा करतात. पण काही घरात एकच गौरी असते. त्यामुळे तुम्ही दोन आणायच्या की एक, हे पण घरात विचारून घ्या.
गौरी साधारण तीन दिवस असतात.पहिला दिवस – आगमनाचा. या दिवशी गौरीला घरी आणून बसवतात. साधा नैवेद्य दाखवतात. दुसरा दिवस – हा मुख्य पूजेचा दिवस. या दिवशी मोठी पूजा असते. पुरणपोळी, 16 भाज्या, भात, वडे असा मोठा नैवेद्य केला जातो. तिसरा दिवस – विसर्जनाचा दिवस. गौरीला परत पाठवतात.
Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
पहिल्यांदा गौरी बसवताना लोक खूप काही सांगतील. असं नाही केलं तर दोष लागेल, तसं केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. तुमच्या घरची परंपरा हाच तुमचा खरा नियम आहे. श्रद्धेने आणि प्रेमाने गौरीला घरी आणा, तिची सेवा करा. बाकी काही लागत नाही. गुरुजींना शंका असेल तर एकदा विचारून घ्या म्हणजे मनातली भीती निघून जाईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)