
फोटो सौजन्य - Social Media
चित्रपटात खालिद या निरागस मुस्लिम मुलाची कथा आहे. शाळेत त्याला ‘अफजलखान’ म्हणून चिडवले जात असल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि माणुसकी, समानता व सामाजिक सलोखा यांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांनी सांगितले की, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून, त्यासाठी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आता चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत ओटीटीच्या माध्यमातून पोहोचत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील जात, धर्म, पंथ आणि भेदभावाच्या वास्तवावर एका लहान मुलाच्या नजरेतून भाष्य करत सकारात्मक बदलाचा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
निर्माते मायकल थेवर यांच्या मते, आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगण्याची गरज आहे. खालिदच्या निरागस प्रवासातून शिवाजी महाराजांच्या विचारांचा व्यापक अर्थ उलगडतो आणि धर्म-जात यांच्या पलीकडे माणुसकीच सर्वोच्च असल्याचा संदेश हा चित्रपट देतो. या चित्रपटाची प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Marché du Film, IFFI इंडियन पॅनोरामा 2025 तसेच अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील India Focus Special Screening साठी निवड झाली होती. विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा गोडवा आणि स्थानिक कलाकारांचा मोठा सहभागही पाहायला मिळतो.
चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी चुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता तो Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies वर उपलब्ध असून, संपूर्ण कुटुंबासह हा विचारप्रवर्तक चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.