
फोटो सौजन्य - Social Media
समीर यांच्या मते, मुलगी राहीच्या शिक्षणासाठी चांगली मराठी शाळा शोधताना त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला. सुरुवातीला गोरेगावमध्ये राहण्याचा विचार होता, मात्र राहीचा प्रवेश दादरमधील बालमोहन विद्यालयात झाल्यानंतर त्यांनी कुटुंबासह दादरलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच काळात समीर आणि त्यांच्या पत्नीने ‘पिठी भात’ हे रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आखली. सुरुवातीला वांद्रे परिसरात रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार होता, मात्र दादरमध्ये राहायला आल्यानंतर तिथेच व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. योग्य जागेच्या शोधादरम्यान त्यांना दादरमध्ये घर खरेदी करण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर रेस्टॉरंटचे स्वप्नही साकार झाले.
समीर यांनी सांगितले की, अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत मुलीचे शिक्षण, नवे घर आणि रेस्टॉरंट अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण झाल्या. या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाची साथ आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय कारणीभूत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘लव्ह लोचा लग्न’, ‘काहे दिया परदेस’, ‘ती परत आलीये’ आणि ‘कॅरी ऑन मराठा’ यांसारख्या लोकप्रिय कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या समीर खांडेकर यांनी आता वैयक्तिक आयुष्यातही नवा अध्याय सुरू केला आहे. गिरणगावाशी असलेली भावनिक ओढ, मुलीच्या भविष्यासाठी घेतलेला विचारपूर्वक निर्णय आणि नव्या व्यवसायाची यशस्वी सुरुवात यामुळे त्यांच्या या प्रवासाचे चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.