फोटो सौजन्य - Social Media
झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर पहिल्याच आठवड्यात अधिराज्य गाजवत आहे. लालबाग-परळच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली ही मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा प्रेक्षकांना जवळची वाटते आहे. साधेपणातही भावनिक खोली, नात्यांमधील गुंतागुंत आणि स्वामींच्या श्रद्धेची जोड यामुळे ही मालिका अल्पावधीतच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, मालिकेने सुरूवातीच्या आठवड्यातच टॉप १० मालिकांमध्ये स्थान मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
‘सनई चौघडे’च्या यशामागे केवळ कथानकच नाही, तर त्याची मांडणी, व्यक्तिरेखा आणि वास्तवाशी साधलेली सांगड हेही महत्त्वाचे घटक आहेत. प्रेक्षकांना स्वतःचे प्रतिबिंब या कथेत दिसत असल्याने मालिकेशी त्यांचा भावनिक कनेक्ट तयार झाला आहे. त्यातच स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि त्यांचा आशीर्वाद या गोष्टींमुळे मालिकेला एक वेगळी आध्यात्मिक छटा मिळाली आहे, जी प्रेक्षकांना भावते आहे. मालिकेच्या लाँचच्या निमित्ताने करण्यात आलेला एक अनोखा उपक्रमही चर्चेचा विषय ठरला. पमा परब आणि तिच्या कुटुंबाने तब्बल ७००० हून अधिक स्वामी भक्तांसोबत ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद केली. हा उपक्रम केवळ मालिकेच्या प्रमोशनपुरता मर्यादित न राहता श्रद्धा आणि सामूहिक भावनेचा अनोखा संगम ठरला. यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणि आपलेपणा अधिक वाढला.
आता मालिकेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होत असताना प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा सरप्राईज तयार आहे. आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा चिन्मय मांडलेकर ‘सनई चौघडे’मध्ये दमदार एंट्री करत आहे. तो ‘सत्यजीत’ ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकात नवा रंग आणि नवा ताण निर्माण होणार आहे. सध्या कथानकात शर्वरी ही नोकरीच्या शोधात विविध मुलाखती देताना दिसते आहे. तिच्या आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी ती झटते आहे. अशातच ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतची असल्याचा योगायोग घडतो. दुसरीकडे जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या तिन्ही व्यक्तिरेखांचा एकाच ठिकाणी झालेला सामना कथेला एक वेगळाच वळण देणार आहे.
सत्यजीतच्या एंट्रीमुळे शर्वरीच्या आयुष्यात काय बदल होणार? तिला ही नोकरी मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जय आणि शर्वरीच्या नात्यात काही ताण-तणाव निर्माण होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कथानकात पुढे काय घडेल याची उत्कंठा आता अधिकच वाढली आहे. ‘सनई चौघडे’ ही मालिका केवळ मनोरंजन करत नाही, तर नात्यांमधील भावनिक पैलू, संघर्ष आणि आशा यांचाही वेध घेते. त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. नव्या ट्विस्टसह आणि दमदार कलाकारांच्या एन्ट्रीमुळे मालिकेचा प्रवास आणखी रंगतदार होणार यात शंका नाही. मग पाहायला विसरू नका ‘सनई चौघडे’, दररोज रात्री ८:३० वाजता, फक्त झी मराठीवर.






