
वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग
पुणे/गायत्री पवळे : ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सिरीजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मराठी रंगभूमीच्या सादरीकरणात मोठे बदल होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. बदलत्या प्रेक्षकवर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेत मराठी नाटकांमध्ये कथानकाची गती, तांत्रिक मांडणी, संवादशैली आणि विषयांची निवड यामध्ये नवे प्रयोग केले जात आहेत. विशेषतः तरुण प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक वेब सिरीजच्या शैलीचा प्रभाव स्वीकारताना दिसत आहेत.
मराठी नाटकांमध्ये दीर्घ संवाद, भावनिक प्रसंग आणि पारंपरिक रंगमंचीय मांडणीला अधिक महत्त्व दिले जात होते. मात्र आता प्रेक्षकांची एकाग्रता कमी वेळ टिकत असल्याने कथानक अधिक वेगवान, थेट आणि वास्तववादी करण्यावर भर दिला जात आहे. वेब सिरीजप्रमाणेच नाटकांमध्ये सस्पेन्स, थरार, डार्क कॉमेडी, रिलेशनशिप ड्रामा आणि सामाजिक वास्तवावर आधारित विषय अधिक प्रमाणात हाताळले जात आहेत. तंत्रज्ञानाचाही रंगभूमीवर मोठा प्रभाव पडत आहे. एलईडी स्क्रीन, डिजिटल साउंड डिझाइन, सिनेमॅटिक लाईटिंग आणि मल्टिमीडिया इफेक्ट्सचा वापर वाढला आहे. काही नाटकांमध्ये दृश्य बदल जलद करण्यासाठी डिजिटल सेट डिझाइनचा वापर केला जातो. त्यामुळे नाटकांचा अनुभव अधिक आकर्षक आणि आधुनिक होत असल्याचे जाणकार सांगतात.
ओटीटी आणि वेब सिरीजच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी रंगभूमीत मोठे बदल घडताना दिसत आहेत. डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या कथानकात, संवादशैलीत आणि सादरीकरणात आधुनिक प्रयोग केले जात आहेत. आजची तरुण पिढी वेगवान आणि वास्तववादी कथांना अधिक पसंती देत असल्याने नाटकांमध्ये सस्पेन्स, रिलेशनशिप ड्रामा आणि सामाजिक विषयांचा समावेश वाढला आहे. – शंतनू गायकवाड, नाटककार.
चित्र बदलतेय, आत्मा जपणे आवश्यक
या बदलांमुळे पारंपरिक रंगभूमीची ओळख कमी होण्याची भीती काही ज्येष्ठ रंगकर्मी व्यक्त करतात. नाटक हे केवळ मनोरंजन नसून प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारे माध्यम आहे. त्यामुळे डिजिटल प्रभाव स्वीकारताना रंगभूमीचा आत्मा जपणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, वेब सिरीजच्या प्रभावामुळे मराठी नाटकांना नवे प्रेक्षक मिळत असल्याचे सकारात्मक चित्रही समोर येत आहे. तरुण पिढी थिएटरकडे पुन्हा वळू लागल्याने रंगभूमीला नवसंजीवनी मिळत असल्याचे निर्माते सांगतात. बदलत्या काळानुसार स्वतःला नव्याने घडवत मराठी रंगभूमी आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे या प्रवाहातून दिसून येत आहे.
मी स्वतः ओटीटी आणि रंगभूमी दोन्हीकडे अभिनय करतो. पारंपारिक पद्धतीच्या नाटकांमध्ये लाऊड अभिनय गरजेचा असायचा परंतु सध्या नैसर्गिक अभिनय बघायला प्रेक्षकांना जास्त रस आहे त्यामुळे आम्ही नाटकांमध्ये सुद्धा तसे प्रयोग करून बघितले आणि ते प्रेक्षकांनी उचलून धरले. हल्लीचा प्रेक्षक वर्ग सुद्धा नाटकाबद्दल वेगळी आवड जपून असलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनुसार आपल्या अभिनयामध्ये बदल करणे कलाकारासाठी गरजेचे झाले आहे. – जीवन आघाव, ओटीटी आणि नाट्य कलाकार.
हे सुद्धा वाचा : ‘सिस्टम’ चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट, आदिनाथ कोठारेने केला किस्सा शेअर