
Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात; रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात सोमवारी (दि.२३) रात्री झाला असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. झारखंडच्या छत्र जिल्ह्यात हा अपघात झाला, त्यात विमानातील सातही जण मृत्युमुखी पडले आहेत. आता याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे बीचक्राफ्ट किंग एअर BE9L विमान संध्याकाळी ७:११ वाजता उड्डाण केले. मात्र, वाराणसीच्या आग्नेयेस अंदाजे १०० नॉटिकल मैल अंतरावर, सायंकाळी ७:३४ वाजता हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. त्यानंतर हा अपघात झाला. यात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची ओळख पटवली जात आहे.
हेदेखील वाचा : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! ८ संशयित दहशतवादी अटकेत; ISI कनेक्शन उघड
यात संजय कुमार (वय ४१) भाजलेले रुग्ण ज्याला उपचारासाठी दिल्लीला नेण्यात येत होते. यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर विमानात असलेले इतर सहा जण पायलट कॅप्टन विवेक विकास भगत, सह-पायलट कॅप्टन सवराजदीप सिंग, फ्लाइट अटेंडंट अर्चना देवी आणि धुरु कुमार, डॉ. विकास कुमार गुप्ता आणि पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात
या विमान अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बचाव आणि शोध पथके पाठवली. विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक पथक पाठवले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे भारतातील एअर अॅम्ब्युलन्स सुरक्षा प्रोटोकॉल आणि ऑपरेशनल देखरेखीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यानुसार, नंतर याप्रकरणाची सखोल तपास करून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
हेदेखील वाचा : Tejas Turbulence: ‘लढाऊ विमान कोसळले नाही’, तेजस अपघातावर HAL चे स्पष्टीकरण, काय म्हटलं?