
ममतांच्या पार्टीत ठाकरेंप्रमाणे उभी फूट
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येताच महाराष्ट्रासारखा एक मोठा राजकीय ‘खेला’ झाला आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपला बहुमतासाठी इतर कोणताही पक्ष फोडण्याची किंवा कोणाच्या सहभागाची अजिबात गरज नाही. असे असूनही, राज्यातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये बुधवारी अखेर मोठी बंडखोरी झाली.
आमदार ऋतब्रत बॅनर्जी बंडखोर यांना ५९ आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांची भेट घेऊन समर्थन पत्र सादर केले. या पत्रावर ५९ सदस्यांच्या सह्या आहेत. बंडखोर आमदारांनी स्वतःला ‘खरी’ तृणमूल काँग्रेस म्हणवून घेत आणि ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते करण्याची मागणी केली. सूत्रांनुसार, या आमदारांच्या पत्राची दखल घेत विधानसभाध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.
पक्षात फूट पडल्यानंतर, ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे सदस्य असलेल्या हकीम यांनी यापूर्वीच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि पक्षाध्यक्ष बॅनर्जी यांना याची माहिती दिली होती.
सर्व कमिट्या बरखास्त
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व कमिट्यांसह सर्व फ्रंटल संघटना तातडीने बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष आता एक सखोल अंतर्गत आढावा घेणार असून, ज्यामध्ये सर्व स्तरांवरील कामकाज आणि संघटनात्मक कार्यपद्धतीचे मूल्यमापन केले जाईल.
व्हिसलब्लोअर आमदारांवर कारवाई अन् बंडाची ठिणगी
पक्षामधील कथित सही प्रकरणावरून (Signature Case) पक्षाविरुद्ध उघडपणे आवाज उठवल्यामुळे, म्हणजेच ‘व्हिसलब्लोअर’ (Whistleblower) भूमिका घेतल्यामुळे टीएमसीने आपल्या दोन आमदारांवर कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी टीएमसीने ऋतब्रता बंदोपाध्याय आणि संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाला शह देण्यासाठी पक्षातूनच एका नव्या गटाची आणि नव्या पक्षाची बांधणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.