
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे भारत आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात. दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावास दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पाठिंबा दिला. तथापि, खर्गे यांनी आधी निवडणूक जिंकू, मग बघू, असे म्हटले आहे.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत 28 पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली. याशिवाय ईव्हीएम, जागावाटपासह अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, जेडीयूकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजीव रंजन सिंह, शिवसेना (उ.बा. ठा.) चे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी उपस्थित होते.
आधी निवडणुका…
निवडणुका समोर असून, त्या जिंकण्यासाठी काम करायचे आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या पदाचे नंतर बघू. लोकशाही वाचविण्यासाठी आता आपल्याला लढाई लढावी लागेल. मोदी सरकारने ज्या 151 खासदारांना निलंबित केले आहे, त्या विरोधात लढू. कोणीच लढू शकणार नाही, असे जर मोदी-शाह यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.
– मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस