
INDIA आघाडीला मोठा धक्का? 'हा' पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
INDIA Alliance News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी होणार किंवा बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत अफवा फेटाळून लावल्या आहेत.
मंगळवारी (7 जुलै 2026) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राज्यसभा खासदार विनोद तावडे यांच्यात झालेल्या कथित बैठकीबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही. त्यांनी सांगितले, “मला या बैठकीबद्दल माध्यमांकडूनच समजले. अशा कोणत्याही बैठकीची माहिती माझ्याकडे नाही. मी स्वतः विनोद तावडे यांना नियमित भेटत असते.”
शरद पवार NDAला पाठिंबा देणार का किंवा त्यात सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “गेल्या १२ वर्षांपासून मी अशाच प्रकारच्या चर्चा ऐकत आहे. त्यावर मी फक्त हसते.” त्या आणि विनोद तावडे हे दोघेही संयुक्त संसदीय समिती (JPC)चे सदस्य असल्याने कामानिमित्त त्यांची नियमित भेट होत असते. “गेल्या महिनाभरात आम्ही किमान २१ वेळा भेटलो आहोत. त्यामुळे अशा भेटींमधून राजकीय निष्कर्ष काढणे योग्य नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही या चर्चा फेटाळून लावत पक्षाकडून कोणत्याही नेत्यासोबत NDAमध्ये जाण्याबाबत चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही विरोधी पक्ष म्हणून शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत राहू.”
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चांबाबत वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, अशा चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “त्यांना विचारधारा महत्त्वाची आहे की सत्ता? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा मार्ग स्वीकारायचा आहे की सत्तेसाठी वेगळी भूमिका घ्यायची आहे, हे त्यांनी ठरवावे.”
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार विनोद तावडे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. विनोद तावडे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. या बैठकीत शरद पवार गट NDAमध्ये सहभागी झाल्यास होणारे राजकीय समीकरण, संभाव्य फायदे आणि सरकारमध्ये सहभागी होण्याच्या पर्यायावर चर्चा झाल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.
सूत्रांच्या दाव्यानुसार, जर शरद पवार गट NDAमध्ये सहभागी झाला, तर केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आणि महाराष्ट्र सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळू शकतात. यामध्ये राज्याच्या अर्थ खात्याचाही समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे. सध्या हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, यापूर्वी अजित पवार यांच्याकडे असलेल्या या खात्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही दावा केल्याची चर्चा आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील संभाव्य राजकीय समीकरण लक्षात घेऊन हे खाते जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवले जात असल्याचीही अटकळ व्यक्त केली जात आहे.
मात्र, या सर्व चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या प्रमुख नेत्यांनी NDAमध्ये जाण्याच्या किंवा पाठिंबा देण्याच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे सध्या या घडामोडी केवळ राजकीय चर्चांपुरत्याच मर्यादित असून, पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.