
नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, एमएसपीवर कायद्याची हमी देण्याची मागणी करत त्यांनी दिल्लीकडे कूचही केले आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनने गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जविरोधात संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जोगेंद्रसिंह उगाहा यांनी राज्यात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅक रोखण्याची घोषणा केली आहे. तथापि, भारतीय किसान युनियन शेतकऱ्यांच्या दिल्ली कूच आंदोलनात सहभागी मात्र नाही. कडेकोट पोलिस बंदोबस्त शेतकरी आंदोलनासंदर्भात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना कठोर धोरण अंगिकारले आहे. यावेळी प्रशासनाने शेतकऱ्यांना हरयाणा, दिल्लीतील कोणत्याही मार्गावर आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही.
सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत.
राहुल गांधींचा जखमी शेतकऱ्यासोबत संवाद
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘दिल्ली चलो मार्च’दरम्यान पोलिस कारवाईत जखमी झालेल्या एका शेतकऱ्याशी फोनवरून चर्चा केली. आंदोलनाला पाठिंबा दिला. पंजाब प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह राजा वडिंग यांनी राजपुरातील एका रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलक शेतकरी गुरमीत सिंह याचे राहुल गांधींसोबत बोलणे करवून दिले.