ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे दर वाढले
नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत डाळ, हरभरा, साखर, मसाले आणि भाजीपाला यांना अधिक मागणी असते. परंतु, यंदा हरभरा डाळ व तूर डाळ यांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. खाद्यतेल, डाळ, साखर, मैदा आणि रव्याच्या दरातही तब्बल १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरखर्चाचा तोल बिघडत असून, ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसणार आहे.
सणांच्या दिवसांत मैदा, रवा आणि गोडधोडासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची मागणी वाढते. या मागणीचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. विशेषतः गोडधोड आणि पंचपक्वान्नांची रेलचेल असलेल्या सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो. सामान्य कुटुंबांची डाळ शिजेनाशी झाली आहे. सणावारांच्या तोंडावर वाढलेल्या मागणीमुळे हरभरा, तूर आणि मसूर डाळींच्या भावात मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, रेशनमधून मिळणाऱ्या डाळ, साखर, रवा, तेल या ‘आनंदाच्या शिधा’ने सामान्यांना दिलासा मिळत होता. मात्र, आता तो शिधा बंद झाल्याने नागरिकांना मोकळ्या बाजारपेठेतूनच वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे महागाईची झळ थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे. या काळात गोडधोडाची मजा घेण्याची इच्छा असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे अनेक कुटुंबांना बजेटमध्ये फेरबदल लागणार आहे.
हरभरा, बेसनसह अनेक गोष्टी महागणार
गौरी-गणपती, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत हरभरा व बेसन डाळीला मोठी मागणी राहणार असून त्याचा परिणाम भावांवर होणार आहे. महागाईची झळ थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.
अन्नधान्याच्या किमती झाल्या होत्या कमी
जुलै महिन्यात अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या होत्या. तेव्हा भारतातील महागाई आणखी मंदावली होती. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई दर जुलैमध्ये आठ वर्षांच्या नीचांकी १.५५% वर घसरल्याचे सांगण्यात आले.