पश्चिम बंगाल : सध्याच्या राजकारणात प्रशांत किशोर हे नाव आवर्जून घेतलं जातं. राजकारण आणि निवडणूक रणनितीकार म्हणून किशोऱ यांची ख्याती आहे. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना काहीजण किंगमेकरही म्हणतात. मागील वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत (West Bengal Elections) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि त्यांचा पक्ष टीएमसीला प्रशांत किशोर यांची पूर्ण मदत मिळाली होती. तर त्यांच्या विजयाचं श्रेयही अनेकांनी किशोर यांना दिलं होतं.
किशोर यांची कंपनी I-PAC ने ही निवडणूक रणनीती बनवण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्याचा पूरेपूर फायदाही टीएमसीला झाला होता. परंतू आता आता I-PAC आणि TMC मधील वाद वाढू लागला आहे. या वादाचा आत्ताचा एपिसोड ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्याबाबत आहे, ज्यांनी दावा केला आहे की त्यांच्या अकाऊंटवरून “वन मॅन वन पोस्ट” संदर्भात काही पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. याबाबत त्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आज तक या वृत्तसंस्थेने असे वृत्त दिले आहे.
ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसने (TMC) गेल्या वर्षी ‘वन मॅन वन पोस्ट’ उपक्रम सुरू केला होता. तेव्हा I-PAC कंपनीनेही त्याला मान्यता दिली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. पण त्यानंतर कोलकाता महापालिका निवडणुकीसाठी फिरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत वन मॅन वन पोस्टच्या दाव्याबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता या उपक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
ममतांच्या टीएमसी सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांची परवानगी न घेता ट्विट करण्यात आले आहेत. याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आता या वादावर I-PAC नेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. I-PAC च्या माहितीनुसार कंपनी कोणत्याही राजकारण्याची डिजिटल मालमत्ता वापरत नाही. जो कोणी असे दावे करत आहे, त्याला एकतर माहिती नाही किंवा तो खोटे बोलत आहेत, असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याचवेळी हे देखील ठळकपणे सांगितले गेले आहे की तयार केलेली सोशल मीडिया अकाऊंट बंगालच्या निवडणुकीपूर्वीच सक्रिय होती. नंतर सर्व पक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आणि प्रत्येक निर्णय पक्षाकडूनच घेतला जात होता.
याच प्रकरणावरून सध्या तरी टीएमसीमध्येच अंतर्गत युद्ध सुरू झाले आहे. अनेकामंध्ये मतभेद सुरू आहेत. अभिषेक बॅनर्जी यांना युवा नेत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असून, या सर्वांच्या वतीने ट्विट करून समर्थन दर्शवले जात आहे. मात्र यामुळे अनेक दिग्गज संतप्त झाले आहेत. आता ममता बॅनर्जी स्वबळावर पक्षाला पुढे नेऊ इच्छित असल्याच्या बातम्याही पसरत आहेत. त्यांना यामध्ये कोणत्याही बाहेरील एजन्सीचा हस्तक्षेप नको आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या त्यांच्या मतभेदाच्या बातम्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. सध्या हा वाद सोडवण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी उद्या म्हणजेच शनिवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांची सकारात्मक चर्चा झाली नाही तर ते आपल्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामाही देऊ शकतात अशाही चर्चा आहे.