(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : स्वयंपाकघरापासून ते तुमच्या खिशापर्यंत, महागाईचा दबाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीने सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर (सीपीआय) वाढून ४.४५% वर पोहोचला आहे, जो याआधीच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये ४.३८% होता. हा आकडा अर्थतज्ज्ञांच्या ४.५०% च्या अंदाजापेक्षा थोडा कमी असला, तरी तो अजूनही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ४% च्या निश्चित लक्ष्यापेक्षा सलग वरच आहे.
या वर्षात नवीन ग्राहक मूल्य सूचकांकाची नवीन मालिका आणि नवीन ‘कंझम्प्शन बास्केट’ स्वीकारल्यापासूनचा हा महागाईचा सर्वोच्च स्तर आहे. महागाई वाढीमागील सर्वात मोठे कारण खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे वाढलेले दर हे आहे, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला. अन्न महागाई दर जूनमधील ५.३२% वरून वाढून जुलैमध्ये ५.५२% वर पोहोचला आहे. चिंतेची बाब म्हणजे शहरांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना याचा फटका जास्त बसला आहे.
नव्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागात अन्न महागाई ५.७९% राहिली, तर शहरी भागात ती थोडी कमी म्हणजेच ५.०५% नोंदवली गेली. कांद्याचा महागाई दर जूनमधील ४.७३% वरून थेट उडी मारून जुलैमध्ये २२.५४% वर पोहोचला आहे. लसणाचा महागाई दरही १७.९३% वरून वाढून ३५.३६% झाला आहे.
इतर गरजा, सेवाही महागल्या
वाहतूक महागाई जूनमधील ४.३१% वरून वाढून जुलैमध्ये ४.४३% झाली, तर मालवाहतुकीचे दर ७.७७% वर आले. वैयक्तिक काळजी, सामाजिक सुरक्षा आणि विविध सेवांचा महागाई दर सर्वाधिक १४.७७% वर आहे, ज्यामध्ये इतर वैयक्तिक वस्तूंचे दर ४३.५४% पर्यंत वाढले आहेत. कपडे आणि पादत्राणांमध्ये ३.३८%, शिक्षणात ३.६४%, घराच्या भाड्यात २.२२% आणि आरोग्य क्षेत्रात १.३४% महागाई नोंदवली गेली.
मिडल ईस्टमधील युद्धाचा दिसतोय परिणाम
सध्या मिडल ईस्टमध्ये सुरु असलेला ताण आणखीन वाढत आहे. याचा परिणाम लहानात लहानापासून ते मोठ्यात मोठ्या क्षेत्रावर होत असलेला पाहायला मिळतो. आता भारतातच सर्वाधिक चर्चेत असलेला डाएट कोक महाग होणार आहे.



