
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा निर्णय उद्या होणार आहे. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर बंडखोर आमदारांविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर त्याचा निकाल विधान सभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. आता यावर उद्या विधान सभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणाचा अंतिम निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. पण, या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यातून त्यांनी दोघांमध्ये मिलीभगत आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
ठाकरे गटाने अर्जात काय म्हटलंय?
ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनी हे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अपात्रतेची टांगती तलवार असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी निकाल देणारे अध्यक्ष नार्वेकर यांची निकालापूर्वीच तीन दिवस आधी भेट घेतली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. याद्वारे ते निकालावर प्रभाव टाकू शकतात, असे ठाकरेंनी दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी केले गंभीर आरोप
लवाद म्हणून आपले विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत असेल किंवा अनधिकृत असेल दोनदा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलेले आहेत. म्हणजे दोनदा ते आरोपीला भेटले आहेत. आमच्या दृष्टीने ते आरोपी आहेत.
आम्ही त्यांच्यावर अपात्रतेचा खटला दाखल केला आहे. आमच्याकडून नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा आहे. पण जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर आम्ही यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा ठेवायची.
शिंदे-नार्वेकर मिलिभगत आहे का?
आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या हे निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. कारण ते न्यायाधिशाच्या भूमिकेत आहेत. न्यायाधीश आणि आरोपीची मिलिभगत आहे का? असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही. यामुळे पुढे देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
लोकशाहीत बहुमताला महत्त्व
निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमताला महत्त्व, बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष आणि चन्ह आम्हाला दिलेले आहे. मेरिटप्रमाणे निकाल लागणार अशी आम्हाला अपेक्षा आहे.