
खासदारानंतर आता आमदारांचं 'ऑपरेशन टायगर'? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) ला एकामागून एक धक्के बसत असताना आता आमदारांमध्येही संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. पक्षाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाल्याच्या घडामोडींनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवालय येथे सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीस विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. बैठकीत सरकारविरोधातील रणनीती, जनहिताचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस सुनील प्रभू, भास्कर जाधव, अनिल परब, सचिन अहिर यांच्यासह बहुतांश आमदार उपस्थित होते. भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात अलीकडे झालेल्या वादानंतरही दोघांची उपस्थिती संघटनात्मक एकात्मतेचा संदेश देणारी मानली जात आहे.
सुरुवातीला तीन आमदार अनुपस्थित असल्याची चर्चा होती; मात्र नंतर चार नावे समोर आली. संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे आमदार बैठकीस गैरहजर राहिल्याचे सांगितले जात आहे. या अनुपस्थितीमुळे राजकीय तर्क-वितर्वांना उधाण आले असले तरी पक्षाने कोणतीही बंडखोरी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदारांना विशेष सूचना
उद्धव ठाकरे हे प्रत्येक अधिवेशनापूर्वी आमदारांची बैठक घेऊन सभागृहात मांडावयाच्या मुद्द्यांबाबत मार्गदर्शन करतात. यावेळी खासदारांच्या बंडामागे निधीअभावाचा मुद्दा पुढे आल्याने त्यावर तसेच आमदारांच्या स्थानिक अडचणींवरही बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
खासदारांच्या बंडानंतर ‘डॅमेज कंट्रोल’
ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा काही अंतरावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटात प्रवेशाची औपचारिक प्रक्रिया सुरू होती. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष संघटना एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा, संघटन बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याबाबत चर्चा झाली.
ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण
पक्षाच्या माहितीनुसार, संजय देरकर आणि सुनील शिंदे हे पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपल्या मतदारसंघात व्यस्त होते. राहुल पाटील हे परभणी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रक्रियेत सहभागी असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तर संजय पोतनीस यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पक्षाचा दावा आहे की, १७ विधानसभा आमदारांपैकी बहुतांश तसेच विधान परिषदेतील सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते.