साधारणत: पावसाळ्यात हिरव्या भाज्या आणि फळांच्या (Vegetable Prices) किमती वाढतात, मात्र मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी भाव तेजीत वाढताना दिसत आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचा भाव 150 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचबरोबर मिरचीच्या भाव वाढताना दिसत आहे. आले-हिरवी मिरचीचा भाव 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत हिरवी मिरची 100 रुपये, तर कोलकात्यात 350-400 रुपये किलोवर पोहोचली आहे. त्याचबरोबर आलेही ३५० रुपये किलोने विकले जात आहे. दरम्यान, सरकारने ही दरवाढ तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. येत्या 15 ते 30 दिवसांत दर कमी होतील. मात्र, काही भाजीपाला व्यापारांच्या म्हणण्यानुसार, हे भाव लवकर कमी होण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत बटाटा आणि कांद्याचे भावही गगनाला भिडू शकतात.
[read_also content=”धक्कादायक! नागपुरात पाणीपुरी खाल्ल्याने जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगचं घेत होती शिक्षण https://www.navarashtra.com/crime/jammu-and-kashmir-student-dies-after-eating-panipuri-in-nagpur-may-428547.html”]
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मान्सूनला देशाच्या काही भागात झालेला विलंब आणि उष्ण वाऱ्यांचा प्रभाव यामुळे जवळपास सर्वच जीवनावश्यक भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच टोमॅटोच्या भावात सर्वाधिक वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या मध्यापासून ते शेवटपर्यंत देशातील काही भागात पावसाने दडी मारल्याने भाज्यांच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या जास्त पावसाची चिंता आहे, ज्यामुळे दुर्गम भागातून मालाच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दिल्लीच्या आझादपूर मंडईत 2 जून ते 3 जुलै दरम्यान टोमॅटोचा भाव 451 रुपये प्रति क्विंटलवरून 6,381 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. या काळात टोमॅटोची आवक ४० टक्क्यांनी घटली आहे. काही प्रमुख टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये टोमॅटोचे पीक निकामी झाल्याने पुरवठा कमी झाला आहे.
मार्च-एप्रिलमध्ये गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले. यानंतर कर्नाटकात टोमॅटो पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला. टोमॅटो हे कमी कालावधीचे पीक आहे. वेगवेगळ्या भागात वर्षातून अनेक वेळा वाढतात. कर्नाटक हे त्याचे प्रमुख उत्पादक आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण वार्षिक टोमॅटो उत्पादनात या 4 राज्यांचा वाटा सुमारे 48 टक्के आहे.
यावेळी बाजारात तोंडली 120 रुपये किलो, तर भेंडी 100 रुपये किलोने विकली जात आहे. बाजारात फुलकोबी दीडशे रुपये किलोने विकली जात आहे. गवार शेंगांची किंमत 100 रुपये किलो आहे. वांग्याचा भाव 70 रुपये किलो आहे. अरबी 70 रुपयांपेक्षा जास्त किलोने विकली जात आहे. वीस दिवसांपूर्वी बाजारात भाजीपाल्याचे भाव सुरळीत होते. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी सांगितले की, अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गोयल यांच्या म्हणण्यानुसार, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकसह इतर काही ठिकाणांहून टोमॅटोची आवक सुरू होताच भाव कमी होतील. गेल्या वर्षीच्या किमतींची तुलना केल्यास फारसा फरक नाही, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला. बटाटा आणि कांद्याचे भाव नियंत्रणात आहेत.






