
दिल्ली विमानतळावरच साचले पावसाचे पाणी
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचले आहे. शुक्रवारी दुपारी काही तास झालेल्या पावसामुळे टर्मिनल ३ मध्ये पाणी साचले. पाणी प्रवाशांच्या बसण्याच्या जागेपर्यंत पोहोचले. विमानतळ कर्मचारी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. भूमिगत मेट्रोदेखील या पूरग्रस्त भागाखालून जाते. परिसरात पाणी शिरू नये यासाठी प्रयत्न सुरू होते.
एका विमानतळ कर्मचाऱ्याने सांगितले की, त्यांनी यापूर्वी विमानतळावर अशी परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. पूर्वी पाऊस पडल्यास पाणी वाहून जात असे. ही परिस्थिती पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासातच निर्माण झाली. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने शनिवारी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गुरुग्राममध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसानंतर दिल्लीतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. बंगालचा उपसागर आणि मध्य प्रदेशवर असलेल्या चक्रीवादळामुळे पुढील ४८ तास अत्यंत गंभीर मानले जात आहेत.
#WATCH | Delhi: Waterlogging witnessed at Indira Gandhi International Airport after heavy rainfall lashed the national capital. pic.twitter.com/vejJpM2W2l — ANI (@ANI) September 4, 2026
मान्सूनच्या पावसामुळे देशभरात हाहा:कार माजला आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, घरे कोसळणे, भूस्खलन आणि वीज कोसळल्याने गेल्या २४ तासांत २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने शनिवारी २३ राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात ईशान्य आणि मध्य भारतात ताशी ७५ किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे आणि वीज कोसळण्याची शक्यता आहे.
अनेक सखल भागांत पाणी
कृष्णा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने आणि भिंती कोसळल्याने १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील बाराची गावात मातीचे घर कोसळून वडील आणि दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. अमेठी आणि बाराबंकीमध्ये भिंत कोसळून दोन वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला.
राजस्थान, गुजरातमध्येही मुसळधार पाऊस
जयपूरसह पूर्व राजस्थानमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे घरे कोसळून आणि वीज पडून ४ जणांचा मृत्यू झाला, तर दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये अपघातांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. डोंगराळ प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शिमला-चंदीगड महामार्गासह अनेक प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.