
तमिळनाडूत 35 कोटींच्या कथित घोडेबाजाराचा आरोप; विजय सरकार पाडण्याच्या कटाप्रकरणी तिघांना अटक
देशभरातून फोडाफोडीच्या राजकारणाच्या बातम्या येत असतानाच आता तामिळनाडूतूनही सत्ताधारी आमदारांना फोडण्यासाठी कथित घोडेबाजार सुरु झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्या टीव्हीके पक्षातील एका आमदाराला फोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर आली असल्याचे आरोप करण्यात आले आहे.
तमिळनाडूतील मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी कथित घोडेबाजाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात तमिळनाडू पोलिसांनी तिघांना अटक केली असून, माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू व्ही. अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षाचे आमदार एन. इलैयाराजा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
इलैयाराजा यांनी तक्रारीत म्हंटले कि, थिरुनावुक्करसू नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून तो इंडियन पॉलिटिकल डेमोक्रॅटिक स्ट्रॅटेजीज (IPDS) या जनमत चाचणी संस्थेशी संबंधित असल्याचा दावा केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एका प्रमुख राजकीय पक्षाच्या वतीने संपर्क साधत विधानसभा अध्यक्षांविरुद्धच्या प्रस्तावावेळी विशिष्ट पद्धतीने मतदान करण्याची विनंती केली. त्याबदल्यात 35 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आल्याचा आरोप इलैयाराजा यांनी केला आहे. तसेच, ही ऑफर नाकारल्यानंतर आपल्याला धमक्या देण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत थिरुनावुक्करसू आणि या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या आणखी दोघांना चेन्नईतून अटक केली.
तपासादरम्यान माजी मंत्री आणि विद्यमान आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू व्ही. अशोक कुमार यांनी आरोपींशी संपर्क साधल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर अशोक कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी नरेश याने, अशोक कुमार आणि सेंथिल बालाजी यांच्या सांगण्यावरून आपण टीव्हीकेच्या आमदाराशी संपर्क साधला, असा जबाब दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. या जबाबांच्या आधारे तपासाचा विस्तार करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी चेन्नई पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली होती. त्यांच्यावरही टीव्हीकेच्या एका आमदाराला पक्षांतरासाठी प्रवृत्त करून सरकार अस्थिर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपपत्र किंवा न्यायालयीन प्रक्रियेत आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोप तपासाच्या अधीन आहेत.