
चेन्नई : दक्षिण कोरियातील (South Korea) बीटीएस (BTS Band) हा म्युझिकल बँड (BTS Band Musical band) सध्या जगभरामध्ये गाजतो आहे. या बॅंडमधील कलाकारांचे जगभरात दिवाने असून खास करुन वर्ग त्यांच्या गाण्याकडे आकर्षित झाला आहे. तमिळनाडूच्या (Tamil Nadu) ग्रामीण भागातील तीन अल्पवयीन मुलीही बीटीएसच्या चाहत्या असून या बँडमधली तरुणांना भेटण्यासाठी त्यांनी अजब धाडस केले. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पोहोचण्यासाठी या मुलींनी 14 हजार रुपये गोळा करुन घरातून पळ काढला. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी त्यांची सुटका केली.
तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय तीन अल्पवयीन मुलींनी बीटीएस म्युझिकल बँडमधील तरुणांना भेटण्यासाठी घर सोडले. या 13 वर्षीय तिन्ही मुली मागील एक महिन्यांपासून याचे दक्षिण कोरियाला जाण्याचे नियोजन करत होत्या. याबद्दल त्यांनी सगळी माहिती इंटरनेटवरुन मिळवत 14 हजार रुपये गोळा केले. आपल्या गावातून चेन्नई आणि मग चेन्नईतून ट्रेनच्या माध्यमातून विशाखापट्टनमला जायचे. तिथून समुद्रामार्गे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला प्रवास करायचा अशी मोहिम अल्पवयीन मुलींनी आखली होती.
मात्र चेन्नईमध्ये त्यांचे स्वप्न भंगले. वेल्लोर जिल्ह्यातील काटपाडी रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी त्यांची सुटका केली. यानंतर पोलिसांनी समुपदेशन करून त्यांच्या प्रवासाच्या नियोजनाची माहिती घेतली. यावेळी मुलींनी आश्चर्यकारक खुलासे केले. त्या विशाखापट्टनम येथून बोटीने सेऊलला जाणार असल्याचे मुलींनी सांगितले. या मार्गाबद्दल त्यांनी इंटरनेटवरून माहिती घेतल्याचे देखील उघड केले.
13 वर्षीय अल्पवयीन मुलींकडे आहेत स्मार्टफोन
घरातून निघून आलेल्या या तिन्ही मुलींच्या घरची परिस्थिती बेताची आहे. एकीची आई ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. तर दुसरीचे वडील दिव्यांग आहेत, तर तिसऱ्या मुलीचे पालक शेतमजूर आहेत. पण या तीनही मुलींकडे स्मार्टफोन असून त्याच्या माध्यमातूनच या मुलींना बीटीएस बँडची आवड निर्माण झाली. त्यांनी गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने कोरियन गाणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलींना बीटीएस बद्दल सर्व माहिती असून त्यांच्या आवडी निवडी, आवडते अन्नपदार्थ, आवडते कपडे देखील माहिती आहेत.
दक्षिण कोरियाला असा केला प्रवास
देशाबाहेर हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण कोरियामध्ये जाण्यासाठी 4 जानेवारी रोजी घर सोडले. तेथून त्या रेल्वेने प्रवास करत चैन्न्ईमध्ये पोहचल्या. तिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये 1200 रुपयांची रुम घेऊन रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मुलींनी पुन्हा ट्रेन पकडली. काटपाडी रेल्वे स्थानकात जेवण घेण्यासाठी त्या स्टेशनवर उतरल्या पण जेवण घेत असताना त्यांची ट्रेन सुटली. यावेळी काटपाडी रेल्वे पोलिसांच्या नजरेस या मुली पडल्या. त्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर करूर जिल्ह्यातील पोलिसांना याची माहिती दिली आणि वेल्लोर जिल्ह्यातील बाल कल्याण समितीकडे तीनही मुलींची रवानगी केली आहे.
या मुलींनी गोळा केलेल्या 14 हजार रुपयांपैकी दोन दिवसांमध्ये अगदी 8 हजार रुपये बाकी होते. एवढ्याशा पैशामध्ये दक्षिण कोरियाला जात येणार नसल्यामुळे या मुली पुन्हा घरी जाण्याच्या विचारामध्ये होत्या. सध्या या मुलींचे समुपदेशन चालू असून पुन्हा असे निघून जाणार नसल्याची कबुली या तीन अल्पवयीन मुलींनी दिली आहे.