माळशिरस : पुरंदर तालुक्यात सध्या बहुतांश रस्त्यांवर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती सासवड-यवत रस्त्यावर राजेवाडी याठिकाणी सुरु असलेल्या पुलाच्या शेजारच्या पर्यायी रस्त्याची. या संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच दुचाकी घसरून अपघातही घडू लागले आहेत.
सासवड-यवत या रस्त्यावर राजेवाडी या ठिकाणी सहा महिन्यांपासून पुलाचे काम चालु आहे. वाहतुक सुरु ठेवण्यासाठी याठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या रस्त्यावर मातीचा चिखल होतो. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दुचाकी शेजारुन एखादी चारचाकी अथवा अवजड वाहन गेल्यास दुचाकीस्वारांवर चिखल उडतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचे कपडे चिखलाने माखून जातात. शिवाय दुचाकी घसरून दुचाकीस्वार चिखलात न्हाऊन निघाल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळत आहे.
जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का ?
या पुलाचे काम सुरु असताना या पुलाखालील कॉंक्रिटलाही मोठा खड्डा पडल्याचे पहावयास मिळत आहे. एवढे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे की काय ?. या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती कधी करणार ? का एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार ? असा सवाल सध्या या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.
[blockquote content=”पुलाचे काम सुरु करण्याआधीच पर्यायी रस्ता हा पक्का करावा लागतो. परंतु पर्यायी रस्त्यावर एखादा अपघात झाला व एखाद्या प्रवाशाचा हात पाय मोडल्यावरच किंवा गंभार दुखापत झाल्यावरच तुम्ही पर्यायी रस्ता करणार का ? ” pic=”” name=”- विठ्ठल जगताप, तालुका अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा”]